Pune : हडपसर आणि शिवाजीनगर भागातील प्रदूषण पातळीने ओलांडली धोक्याची मर्यादा

पी एम 2.5 अतिशय सूक्ष्म धूलिकणांनी ओलांडला 300 चा धोकादायक टप्पा

एमपीसी न्यूज- वाहनांची प्रचंड संख्या आणि त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाने पुण्यात उच्चांक गाठला असून असून हडपसर आणि शिवाजीनगर भागात रदूषणाने पुण्यात धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुणे वेधशाळेतर्फे पुण्यात चौक-चौकामध्ये उभारण्यात आलेल्या माहितीफलकावरून ही बाब स्पष्ट झाली आहे. पी एम 2.5 या अतिशय सूक्ष्म धूलिकणांमुळे पुण्याचे हवामान प्रदूषित झाले आहे. या धूलिकणांची पातळी सर्वसामान्यपणे 50 इतकी असायला हवी मात्र हडपसर आणि शिवाजीनगर भागात या पातळीने ३०० चा अतिशय धोकादायक टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे भविष्यात पुणे सर्वाधिक प्रदूषण असलेले शहर म्हणून ओळखले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

एकेकाळी पुणे हे आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध होते. पण कालांतराने पुणे शहराचा विस्तार वाढला, सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवेच्या अभावी खासगी वाहनांची संख्या वाढली. एकेकाळी सायकलींचे शहर अशी ओळख असणारे पुणे सर्वाधिक दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर पुण्यात आयटी कंपन्यांनी आपले जाळे उभारण्यास सुरुवात केल्यानंतर पुणे शहर चारही दिशेने वाढू लागले. परिणामी पुण्याच्या हवामानात बदल होऊन हळू हळू प्रदूषणाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली.

पुणे शहरात काही प्रमुख चौकांमध्ये पुणे वेधशाळेतर्फे प्रदूषणाची पातळी दर्शवणारे डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. या फलकावर प्रदूषणाच्या पातळी संदर्भात दररोज सविस्तर माहिती देण्यात येते. आज, सोमवारी दाखवण्यात आलेल्या माहितीमध्ये पुणे शहराच्या हडपसर आणि शिवाजीनगर भागातील प्रदूषणाच्या पातळीने धोक्याची मर्यादा ओलांडली असून पी एम 2.5 या अतिशय सूक्ष्म धूलिकणांच्या पातळीने 300 चा धोकादायक टप्पा पार केला आहे.

पीएम 2.5 हा एक असा घटक आहे जो इंधनाच्या किंवा कोळसा, लाकूड यांच्या ज्वलनातून निर्माण होतो. हा घटक अतिसूक्ष्म स्वरूपात हवामानात असतो. हा धूलिकण इतका सूक्ष्म असतो की मानवी केसांच्या परिघापेक्षाही 3 टक्के कमी आकाराचा हा धूलिकण मानवी शरीरात श्वसनावाटे सहजपणे प्रवेश करतो. पुण्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे पीएम 2.5 या धुलीकणाने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे.

सुदैवाने पुण्याच्या काही भागात झाडांची संख्या जास्त आहे. त्या भागात हरित आच्छादन निर्माण झाल्यामुळे या धूलिकणांची मर्यादा धोक्याच्या पातळीपेक्षा कमी आहे. मात्र शिवाजीनगर आणि हडपसर हा भाग सतत प्रचंड गर्दीचा, तसेच वाहनांच्या वर्दळीचा असल्यामुळे या भागात पीएम २.५ या धूलिकणांनी 300 चा टप्पा पार केला आहे. त्यामुळे येथील नागरिकांसाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे.

पीएम 2.5 या घटकासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO ) दिलेले निकष

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO ) दिलेल्या निकषानुसार पीएम 2.5 हा घटकाची पातळी 0-50 असेल तर मानवी शरीराला कोणताही अपाय नसून हवामान उत्तम असल्याचे ते द्योतक आहे. 51-100 असल्यास समाधानकारक, 101 ते 200 असेल तर आरोग्याच्या समस्या असलेल्या, प्रकृती नाजूक असलेल्या व्यक्तीसाठी ही पातळी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा व्यक्तींनी शहरातील वातावरणात जास्त फिरू नये. जेणेकरून त्यांना प्रदूषणाचा त्रास होऊन आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. मात्र निरोगी व्यक्तीला याचा धोका नसतो. मात्र हीच पातळी जेंव्हा 201-300 चा टप्पा ओलांडते त्यावेळी ह्रदयरोग आणि श्वसनाचे विकार असलेल्या लोकांसाठी, वृद्ध आणि लहान मुलांसाठी धोकादायक ठरते. अशा व्यक्तींनी बाहेरच्या प्रदूषित वातावरणात फिरणे म्हणजे रोगाला आमंत्रण देण्यासारखे ठरते.

 

 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.