Pune : लोकसभा निवडणुकीबाबत मी पोपटलाही देखील विचारले नाही -अजित पवार
एमपीसी न्यूज – मागील तीन-चार दिवसांपासून चॅनेलवर लोकसभा निवडणुकीबाबत एक्झिट पोलवर चर्चा होत आहे. त्यावर माझा विश्वास नसून मी काही ज्योतिषी नाही. तसेच निवडणुकीबाबत मी पोपटाला देखील विचारले नाही. या निवडणुकीत आमच्या किती जागा येतील?, याबाबत विचारले असता, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकाराशी संवाद साधताना ‘एक्सझिट पोल’बाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.
जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेच्या प्रवेशाबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांच्या कौटुंबिक वादातून राष्ट्रवादी सोडली आहे. विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन ते शिवसेनेत गेले आहेत. ते गेल्यामुळे पक्षाचे नुकसान असून अधिक काम करून आम्ही ते नुकसान भरून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर म्हणाले की, राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून त्यावर हे सरकार कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करताना दिसत नाही. शेतात काही पिकले नसल्याने आता सरकारने 2 किंवा 3 रुपये किलो दराने अन्न धान्य उपलब्ध करून दिले पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.