Pune : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील कारागृहातही प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू

एमपीसी न्यूज – राज्यातील कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा अधिक बंदी बंदिस्त आहेत. सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण राज्यातील काही भागात झालेली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. तुरुंगातील बंदी जणांना त्याची लागण होऊ नये, यासाठी न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार बंदी जणांना तात्पुरता जामीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा सुनील रामानंद यांनी दिली.

सुनिल रामानंद म्हणाले, राज्यातील सर्व कारागृहांमध्ये पस्तीस हजाराहून अधिक बंदी बंदिस्त आहेत. येरवडा, मुंबई सेंट्रल (ऑर्थर रोड) ठाणे आणि नाशिक या चार मध्यवर्ती कारागृहातील तसेच इतर कारागृहातील किरकोळ व मध्यम स्वरूपाच्या गुन्हयातील बंद्यांना नियमित जामीन किंवा तात्पुरता जामीन उपलब्ध झाल्यास तुरुंगातील बंद्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल.

राज्यात 45 ठिकाणी साठ कारागृह आहेत. येथील एकूण क्षमता 24 हजार बंदी ठेवण्याची आहे. सध्या 38 हजार बंदी ठेवण्यात आले आहेत. कारागृहातील बंद्यांची तसेच त्यांना भेटावयास येणार्‍या नातेवाईकांची आवक-जावक कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. न्यायालयीन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फिजिकल प्रोडक्शन 100 टक्के थांबवून ते व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे करण्याची विनंती करण्यात आली आहे. पैशाअभावी जामीन न मिळालेल्या बंद्यांसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे, असे रामानंद यांनी सांगितले.

याशिवाय प्रिझन गेटमधून येणा-या प्रत्येकाची मेन गेटच्या बाहेरच वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. या वैद्यकीय तपासणीमध्ये ताप, खोकला, सर्दी अशी साधारण शारीरिक तपासणी असणार आहे. तुरुंगामध्ये वैद्यकीय तपासणी शिबिर ही सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दुर्दैवाने एखाद्या बंद्यास लागण झाल्यास त्याला स्वतंत्र आयसोलेटेड सेलमध्ये ठेवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.