Pune News : सरकारने महागाईवर नियंत्रण न आणल्यास भारतीय मजदूर संघाचा राज्यभर रास्ता रोकोचा इशारा

एमपीसी न्यूज – जीवनावश्यक घटकांच्या बाजार मुल्यावर नियंत्रण ठेवण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्य सरकारने सामान्य माणसाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. केंद्र व राज्य सरकारने महागाई नियंत्रणात न ठेवल्यास भारतीय मजदूर संघाचा वतीने संपूर्ण राज्यात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलन प्रसंगी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे यांनी दिला.

केंद्र व राज्य सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधात भारतीय मजदूर संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि. 8) निदर्शने करण्यात आली.  या वेळी केंद्र व राज्य सरकारकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी स्वीकारले.

यावेळी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष अॅड. अनिल ढुमणे, जिल्हा सेक्रेटरी जालिंदर कांबळे, कोषाध्यक्ष अजेंद्र जोशी, संघटक विवेक ठकार, विज उद्योगातील  महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष नीलेश खरात, औद्योगिक विभागाचे अर्जुन चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, सचिन मेंगाळे, तसेच औद्योगिक, बॅंक, संरक्षण, सुरक्षा रक्षक,  विज ऊद्योग, कंत्राटी कामगार, महानगरपालिका, हाॅस्पीटल, विविध मंदिरातील सेवक उपस्थित होते.

पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्य तेल अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करून दरवाढीला नियंत्रण आणावे. डिझेल, पेट्रोल अन्य वस्तू प्रमाणे जीएसटीच्या कक्षेत आणावे. अवाजवी नफाखोरी टाळण्यासाठी प्रत्येक वस्तूवर त्या वस्तूंचा उत्पादन खर्च छापण्यासाठी कायद्याने सक्ती करावी, राज्यातील घरेलू, बांधकाम, फेरीवाले, रिक्षावाले,  टॅक्सीचालक, माळीकामगार, पुजारी, भटजी, सोनार, कारागीर, शिंपी यासह असंघटीत क्षेत्रातील कामगारांना 10 हजार रुपये अनुदान म्हणून द्यावेत. खाद्य तेल, डाळी बाबतीत देश आत्मनिर्भर करण्यासाठी खाद्यपदार्थांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवावे. सार्वजनिक उद्योगातील व खाजगी उद्योगातील कामगारांना महागाईच्या प्रमाणात मोबदला मिळावा आदी मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले आहे.

अनिल ढुमणे पुढे म्हणाले, “मागील दीड वर्षापासून सुरू असलेल्या करोना महामारी व लाॅकडाऊनमुळे संघटीत व असंघटीत कामगारांवर मोठ्या प्रमाणात प्रमाणात त्रस्त आहे. लाॅकडाऊनचे कारण दाखवून अनेक मालकांनी कामगार कपात, वेतन कपात, महागाई भत्ता बंद करणे, वेतन वाढ करार लांबणीवर टाकणे, शाळा काॅलेज बंद असल्याने तसेच सर्वच ठिकाणी गर्दीचे कारण दाखवून आवश्यक सभा समारंभ यावर मर्यादा आल्याने या क्षेत्रातील कामगारांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे, त्यातच जीवनावश्यक वस्तू, सेवा यांच्या किंमती गगनाला भिडल्या असून पेट्रोल डिझेल, खाद्यतेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे सामान्य माणूस, कामगार मेटाकुटीस आला आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.