Pune : जैन समाजाची विचारसरणी विकासकार्यामध्ये महत्त्वाची- गिरीश बापट

एमपीसी न्यूज- उदार आणि उदात्त दृष्टिकोनातून जैन समाजाने राष्ट्रीय वृत्तीची आजवर जोपासना केली. हा समाज राष्ट्रीय वृत्तीपासून कधीच दूर राहिला नाही. आपल्या अखंडत्वाची जोपासना व संवर्धन करण्यात जैन बांधवांनी महत्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. जैन समाजाची विचारसरणी जीवन पद्धतीच्या विकासकार्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

महावीर जयंतीचे औचित्य साधून गिरीश बापट यांनी टिम्बर मार्केट, वडगाव शेरी, येरवडा भागातील कार्यक्रमांना उपस्थित राहून जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या. टिम्बर मार्केट येथील जैन सामुदायिक उत्सव समितीमार्फत मिरवणूक काढण्यात आली होती. यात बापट सहभागी झाले. या मिरवणुकीत गो-रक्षण, मतदान करण्याबाबत जनजागृती आली. यावेळी नगरसेवक राजेश येनपुरे, अजय खेडेकर,अचल जैन, करण शहा, शरद शहा, सचिन गेलडा, अनिल गेलडा, गिरीश सोळंखी, नितीन जैन, जितेंद्र कालेडिया, अरविंद कोठारी उपस्थित होते.

  • यावेळी गिरीश बापट म्हणाले, “महावीरांचे विचार आज आचारणात आणण्याचा दिवस आहे. त्यांच्या शिकवणी प्रमाणे, विचाराप्रमाणे आपण व्यवहारात वागतो की नाही हे तपासायला हवे. समाजाच्या कल्याणाचा उदात्त हेतू ठेवून जैन साधक संसाराचा त्याग करतात. हा त्याग आपण लक्षात घेऊन त्यांच्या विचारांचे पाईक व्हायला हवे. मानवतावादाकडे नेणाऱ्या जैन धर्माची बहुमोल शिकवण आज सर्वांनी आचरणात आणायला हवी. लाखो शत्रूंच्या विरोधात जिंकण्यापेक्षा स्वतःच्या वागणुकीत जिंकण्याला महत्व देणाऱ्या वर्धमान महावीर यांचे आदर्श विचार अंगिकारायला हवेत”

महावीरांनी नैतिक व व्यावहारिक जीवन यांचा समतोल घडवून आणला त्याला आजही तोड नाही. कसब्यात गेली अनेक वर्षे आम्ही महावीर जयंती उत्साहात साजरी करतो. महावीरांचे विचार समोर ठेवून वडिलोपार्जित जमिनीवर मी गो-शाळा उभी केली असून गेल्या ४५ वर्षाच्या राजकीय जीवनात मी कोणत्याही धार्मिक स्थळावर राजकारणावर बोललो नाही, असे बापट यांनी आवर्जून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.