Pune : कोंढवा भिंत दुर्घटना प्रकरण; बिल्डरांच्या दुर्लक्षामुळे भिंत कोसळली?
रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिकांना 5 महिने अगोदर दिली होती पूर्वकल्पना
एमपीसी न्यूज – कोंढवा बुद्रुक येथे संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना ‘त्या’ बिल्डरांच्या दुर्लक्षामुळे घडल्याचे समोर आले आहे. येथील रहिवाशांनी संरक्षण भिंत आणि प्रलंबित काम याबाबत संबंधित बिल्डरला 5 महिने अगोदर पूर्वकल्पना दिली होती. तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे सांगण्यात येत आहे.
कोंढवा येथील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बिल्डर अगरवाल याच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेले सर्व अल्कॉन लँडमार्कस् रजिस्टर संस्थेचे भागीदार आणि कांचन रजिस्टर संस्थेचे भागीदार आहेत. तर विपुल आणि विवेक अगरवाल यांना अटक केली आहे. कोंढव्यामधील सोमजी पेट्रोल पंपाजवळ इमारतीच्या पार्किंगची भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला तर, दोनजण जखमी झाले होते. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. बांधकाम मजुरांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर ही भिंत कोसळली.
- याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, बिल्डरकडून पार्किंगसह अनेक कामे प्रलंबित असताना सदनिकाधारक येथे राहण्यास आले होते. त्यांनी संबंधित बिल्डरला प्रलंबित कामे आणि संरक्षण भिंत याबाबत ई मेल द्वारे कळविले होते. आम्ही 16 फेब्रुवारी रोजी विवेक अग्रवाल यांच्यासह एक बैठक घेतली होती. यात रहिवाशांनी बिल्डरला प्रलंबित कामाबाबत सांगितले होते. तरीही याकडे बिल्डरने दुर्लक्ष केल्याने हि दुर्घटना घडली आहे, असे सदनिकाधारकांचे म्हणणे आहे.