Pune : घाबरलेल्या सरकारचा लॉकडाऊन – मनसेची टीका
Lockdown of frightened government - MNS criticism
एमपीसी न्यूज – घाबरलेल्या राज्य सरकारने आज (सोमवार) मध्यरात्रीपासून पुणे शहरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा शब्दांत मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी टीका केली आहे.
लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या आयुक्ताची बदली करण्यात आली. कारण त्यांनी लॉकडाऊनला विरोध केला होता, कोरोनाच्या सुरवातीच्या काळात ससूनचे अजय चंदनवाले याची बदली करण्यात आली, कारण स्थानिक कॉग्रेस पुढाऱ्याचा विरोध होता, राज्य सरकार कसे काम करीत आहे त्याचे हे उदाहरण आहे.
राज्य सरकार विश्वासातच घेत नसल्याचे मनपा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लॉकडाऊन जाहीर केला हे त्यांना दोन दिवसांनी कळते. व्यापाऱ्यांनी विरोध केल्यावर त्यांना महत्व कळले. पुण्यात रोज सरासरी २० मृत्यू होत असताना, रोज एक हजाराने करोना पेशन्ट वाढत असताना, गेली चार दिवस करोना पेशन्टला हॉस्पिटल मिळत नसताना, मनपा सत्ताधाऱ्यांना एकदाही राज्यसरकार बरोबर का बोलावंसं नाही वाटलं ? आणि जर असे बोलणे झाले नसेल तर रोज विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त इतर सगळे अधिकारी याच्या बैठक वगैरे व्हायच्या त्या काय असायच्या? त्याच्या माध्यमातून काय रोज चहा पाणी कार्यक्रम होत होते काय ? असे अनेक सवालही मनसेने उपस्थित केले आहेत.
पुणे महानगरपालिका पातळीवर करोना काळ हा मनपातील अनेक मंडळींना सुगीचा काळ असल्या सारखे होते. घाबरलेल्या सरकारने लॉकडाउन लादले आहे. हे लॉकडाऊन मनपा आणि राज्य सरकारचा नाकर्तेपणा अधोरेखित करणारा आहे, अशा शब्दांत मनसेने महाविकास आघाडीवर आणि पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.