Pune News: खडकवासला धरणातून आतापर्यंत तब्बल 7.84 टीएमसी पाणी सोडले

हे पाणी उजनी धरणात जाते. त्यामुळे सोलापूरकारांच्या पाण्याची सोय झाली आहे. पुणे शहराला पाच महिने पुरेल एवढा हा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे 100 टक्के भरण्याच्या स्थितीत आहेत. खडकवासला धरणातून आतापर्यंत तब्बल 7.84 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी उजनी धरणात जाते. त्यामुळे सोलापूरकारांच्या पाण्याची सोय झाली आहे. पुणे शहराला पाच महिने पुरेल एवढा हा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

खडकवासला 1.97 टीएमसी (100%), पानशेत 10.65 टीएमसी (100%), वरसगाव 12.82 टीएमसी (100%), टेमघर 3.25 टीएमसी (87.62%) असा एकूण 28.69 टीएमसी म्हणजेच 98.37% पाणीसाठा आहे.

मागील वर्षी आजच्या दिवशी 28.73 टीएमसी म्हणजेच 98.58% पाणीसाठा होता. बुधवारी दिवसभरात चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली. खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यातून 1054 क्युसेक वेगाने, तर मुठा नदीत 856 क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

वरसगाव आणि पानशेत धरणांमधून वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. दिनांक 3 ऑगस्टच्या रात्रीपासून चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणेकरांना महिन्याला साधारण दीड टीएमसी पाणी लागते. वर्षाला सुमारे 18 टीएमसी पाणी पुणेकरांना लागते. आता धरणांत तब्बल 28 टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.