Pune News : भाजपचे लोक ग्रंथ न वाचता वर्तन करतात म्हणून दंगली घडतात : राज्यमंत्री अब्दुल सत्तार

एमपीसी न्यूज : भाजपचे लोक गीता-कुराण हे पवित्र ग्रंथ न वाचता फक्त कपाटात ठेवतात. त्यांनी कुराण व गीता वाचून घ्यावे तरच त्यांना त्यातील सार कळेल. हे ग्रंथ न वाचता ते वर्तन करतात म्हणून देशात दंगली घडतात, असे धक्कादायक वक्तव्य शिवसेनेचे आमदार व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

पुण्यातल्या कोंढवा परिसरात जमियत उलमाँ व प्रसाद बाबर यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळी भाषणात त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी माजी आमदार महादेव बाबर, आमदार चेतन तुपे, रशीद शेख, अंजुम इनामदार आदी उपस्थित होते. रक्तदान करणाऱ्या नागरिकांना गीता आणि कुराण ग्रंथांच्या प्रती देण्यात आल्या.

राज्यमंत्री सत्तार म्हणाले, ”कोरोना काळात मुस्लिम बांधवांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्याय केला असा आरोप विरोधक करत आहेत. या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत विरोधक गैरसमज पसरवत आहेत. कोरोनाच्या काळात जगभरातील देशांत मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमण होते आहे. जगाच्या तुलनेत भारतात संक्रमणाचे प्रमाण कमी झाले आहे. हे सर्व अल्लाताला व राज्याच्या आरोग्य यंत्रणेमुळे शक्य झाले आहे.

औरंगाबादच्या नामांतरावर सत्तार म्हणाले, औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलनाच होऊ शकत नाही. आता तर मीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर निष्ठा आसणाऱ्या पक्षात आलो आहे. समाजात तेढ निर्माण होण्यासाठी काही लोकं पुड्या सोडत आहेत. त्यात काही तथ्य नाही. वेरूळ-अजिंठा येथे छत्रपती शिवाजी महाराज याचं स्मारक बांधत आहोत. त्यांचं काम जागतिक स्थरावर नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मी पुन्हा येईल म्हणणारे काही पुन्हा आलेच नाहीत, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोमणा मारला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.