Pune News : ‘जनसामान्यांसाठी झटणारा नेता गमावला’ चंद्रकांत पाटील यांनी दिलीप गांधी यांना अर्पण केली श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – माजी केंद्रीय राज्यमंत्री व माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाने जनसामान्यांसाठी झटणारा आणि अहमदनगर जिल्ह्यात भाजपचा पाया मजबूत करणारा नेता गमावला आहे, अशी श्रद्धांजली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्पण केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, दिलीप गांधी यांनी अहमदनगर जिल्ह्यात स्थानिक पातळीवर भाजपचा पाया मजबूत करण्यावर भर दिला. त्यांनी पक्षामध्ये जिल्हा सरचिटणीस व जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. अहमदनगर पालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले. गरीब आणि वंचितांची सेवा करण्यावर त्यांचा भर होता. लोकसभा सदस्य म्हणून त्यांची तीनवेळा निवड झाली. त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणूनही काम केले. राजकारणात उच्चपदावर पोहोचल्यावरही त्यांनी सर्वसामान्य लोकांबद्दलची बांधिलकी कायम ठेवली होती.

अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता व अहमदनगर जिल्ह्यातील कारसेवकांचे नेतृत्व केले होते. भाजपने जनसामान्यांच्या सेवेत समाधान मानणारा नेता गमावला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात भाजप, महाराष्ट्र सहभागी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.