Pune News : कोविड उपचारात होणारा विलंब हे मृत्यूचे मुख्य कारण
आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, दौंड आणि इंदापूर या तालुक्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.
एमपीसी न्यूज – सध्या कोरोना संसर्ग थांबवण्याच्या प्रयत्नासोबतच कोरोनाबाधित रुग्णांना योग्य वेळेत उपचार उपलब्ध होण्याचे आव्हानही समोर उभे राहिले आहे. रुग्णांना उपचारांसाठी होत असलेला विलंब हा रुग्णांच्या मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे.
पुणे जिल्हा परिषदेने पुण्यातील ग्रामीण भागात केलेल्या पहिल्या 245 रुग्णांच्या मृत्यूच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. बहुतेक रुग्ण हे कोरोना बाधित झाल्यानंतर चार दिवसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले, त्यामुळे त्यांच्यावर तातडीचे उपचार होऊ न शकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती या विश्लेषणातून मिळत आहे. त्यातही आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, दौंड आणि इंदापूर या तालुक्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.
३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक 24 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाचे निदान झाल्यानंतर ज्या रुग्णांवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले त्यांचे प्रमाण 73 किंवा 29.8 टक्के तर दोन ते चार दिवसांनी 115 किंवा 46.93 टक्के तर पाच ते सहा दिवसात 14.28 टक्के आणि सातव्या दिवशी सर्वात कमी आढळून आले.
उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे 24 तासाच्या कालावधीत 14 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. उपचाराच्या पहिल्याच दिवशी मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण हे 10.20 टक्के आहे. दोन ते चार दिवसांत 78 रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण 30.59 टक्के तर पाच ते सहा दिवसांत 30 रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण 11.76 टक्के आणि सातव्या दिवशी सर्वाधिक म्हणजेच मृत्यूचे प्रमाण 38.1 टक्के आहे.
तालुका | एकूण मृत्यू | मृत्यू दर |
आंबेगाव | 28 | 11.42 |
बारामती | 8 | 3.26 |
भोर | 8 | 3.27 |
दौंड | 14 | 5.71 |
हवेली | 56 | 22.86 |
इंदापूर | 11 | 4.48 |
जून्नर | 23 | 9.38 |
खेड | 25 | 10.2 |
मावळ | 14 | 5.71 |
मुळशी | 13 | 5.30 |
पुरंदर | 7 | 2.85 |
शिरुर | 34 | 13.88 |
वेल्हा | 4 | 1.63 |
एकूण | 245 | 100% |