Pune News : कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार

एमपीसी न्यूज – एका विशिष्ट कंपनीचे खाद्य खाल्ल्याने पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यानी अंडे देण्याचे बंद केल्याने काही पोल्ट्री धारक शेतकऱ्यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. लोणी काळभोर पोलिसांनीही या शेतकऱ्यांची तक्रार या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आळंदी म्हातोबा येथील काही पोल्ट्री धारक शेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी एका कंपनीकडून कोंबड्यांसाठीचे खाद्य विकत घेतले होते. हे खाद्य खाल्ल्यानंतर कोंबड्यानी अंडे देणे बंद केले. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी एकत्र येत लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि संबंधित कंपनी विरोधात तक्रार दिली.

पोलिसांनीही या शेतकऱ्यांची तक्रार दाखल करून घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनादेखील या प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच संबंधित कंपनीने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.