Pune News : तळजाई टेकडी वाचविण्यासाठी गांधी जयंती दिवशी ‘हरित दांडी यात्रा’

एमपीसी न्यूज – तळजाई टेकडीवरचा जैवविविधतेने समृद्ध असणारा निसर्गरम्य परिसर विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. येथील जागेचे काँक्रिटीकरण होऊन नैसर्गिक अधिवास संपुस्टात येण्याबरोबरच पुण्यातील ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळजाई टेकडीची ओळख पुसली जाण्याची भिती निर्माण होत आहे. त्यामुळे माय अर्थ फांउडेशनतर्फे आणि पर्यावरणप्रेमी संस्थेंच्या वतीने गांधी जयंतीदिवशी (शनिवारी, दि. 02) ‘हरित दांडी यात्रा’ काढण्यात येणार आहे.

शनिवारी सकाळी 7.30 वा. यात्रेची सुरुवात तळजाई माता मंदिर येथून सुरु होऊन सदू स्टेडीयम येथे यात्रेचा समारोप होणार आहे.

माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत म्हणाले की, तळजाई येथील प्रस्तावित बांधकामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार व जमीन सपाटीकरण होणार, अनेक प्राणी, पक्षी यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होणार हे उघड असल्याने या ठिकाणी या प्रकल्पास निसर्गप्रेमी विरोध दर्शवित आहेत. तळजाई टेकडीची जैवविविधता नैसर्गिकदृष्ट्या जशी आहे तशी राहावी, असे पर्यावरणप्रेमींना वाटत असून त्यामुळे गांधी जयंती निमित्ताने हरित दांडी यात्रेचे आयोजन केले आहे. प्राणी, पक्षी, आणि झाडांच्या प्रतिकृतीत प्रबोधनात्मक कार्यक्रम यावेळी करण्यात येणार आहे. त्यामुळे तळजाई माता मंदिर येथे जास्तीत जास्त पर्यावरणप्रेमींनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी घरत यांनी केले.

दरम्यान, पर्यावरणप्रेमींनी नुकतेच तळजाई टेकटीवरील प्रस्तावित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पास विरोध असल्याबाबत आणि नदी-नाले यांचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतचे निवेदन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.