Pune News: मंदिरे उघडली नाही तर मंदिर सत्याग्रह करावा लागेल – खासदार गिरीश बापट

एमपीसी न्यूज – राज्य शासनाने त्वरित मंदिरे उघडली नाहीत, तर मंदिर सत्याग्रह करावा लागेल, असा इशारा खासदार गिरीश बापट यांनी दिला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील मंदिरे खुली व्हावी, या करता संपूर्ण राज्य भर अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा एक भाग म्हणून कसबा मतदारसंघात २४ ठिकाणी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. ओंकारेश्वर मंदिर येथे खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी बापट यांनी राज्य सरकार हेतुपुरस्सर मंदिरे मशिदी चर्च बंद ठेऊन लोकभावना दुखावत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारला नागरिकांनी संपूर्ण सहकार्य केले, पण आता दारूची दुकाने व्यापारी बाजारपेठ हॉटेल इत्यादी चालू होत असताना, मंदिर – मशिदी बंद ठेऊन सरकार अन्याय करत आहे. त्यामुळे जर मंदिरे उघडली नाहीत, तर मंदिर सत्याग्रह करणार असल्याचा इशारा बापट यांनी दिला.

या आंदोलनाला आमदार मुक्ता टिळक,पुणे शहर सरचिटणीस नगरसेवक राजेश येनपुरे ,कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, सुनील माने,पुष्कर तुळजापूरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शनिवारी भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण पुणे शहरात मंदिरे उघडण्यासाठी प्रभाग वाईज आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये खासदार, आमदार, नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.