Pune News : ‘आम्ही घडलो वाचनाने’च्या नव्या आवृत्तीत अमिताभ व शाहरूख यांचाही वाचन प्रवास …!

एमपीसीन्यूज : जीवनात वाचन किती महत्त्वाचे आहे व वाचनाने आम्ही कसे घडलो या दिग्गज मंडळींच्या मुलाखती असलेल्या लेखक विजय जगताप यांच्या “ आम्ही घडलो वाचनाने” या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीत आता महानायक अमिताभ बच्चन व किंग खान शाहरूख खान यांची एन्ट्री झाली आहे.

येत्या 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिनाच्या दिवशी या पुस्तकाच्या तिस-या आवृत्तीचे आगमन होत आहे. वाचनाचा आपल्याला असलेला छंद, वाचलेली पुस्तके व वाचनाने आपल्या जीवनावर पडलेला प्रभाव हे उदाहरणासह व आपल्या घरातील पुस्तक भांडाराची माहिती अमिताभ व शाहरूख यांनी मांडली आहे.

वाचन या विषयाला वाहिलेल्या या पुस्तकाचे कौतूक देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मुख्यमंत्री असताना लेखी पत्र लिहून केले होते.

ज्येष्ठ नेते शरद पवार, लता मंगेशकर, लालकृष्ण अडवानी, अण्णा हजारे, विश्वास नांगरे पाटील, नागराज मंजुळे यांच्या वाचनाविषयीच्या मुलाखती तसेच महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, यशवंतराव चव्हाण व डाॅ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या वाचनविषयीच्या माहितीचे संकलन या पुस्तकात आहे.

वाचनाने माणूस कसा समृध्द होतो, वाचन माणसाचे जीवन कसे बदलवते असा सारा वाचनाविषयक प्रवास या पुस्तकात मांडण्यात आला आहे.

अंशुल प्रकाशनने या पुस्तकाची निर्मिती केली असून सोहम लायब्ररीचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची या पुस्तकाच्या माहिती संकलनासाठी मोठी मदत झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.