Pune News : आयुष्य म्हणजे टाईमपास नाही – डॉ. पी. एन. कदम

एमपीसी न्यूज : आयुष्यात मजा-मस्ती गरजेची आहे. पण संपूर्ण आयुष्य म्हणजे केवळ मस्ती व टाईमपास नव्हे. तरुणांनी आपले आयुष्य हे केवळ आपल्यासाठी नव्हे तर समाजाला, देशाला दिशा देणारे असावे, असे काम करावे, असे मत ज्येष्ठ समुपदेशक डॉ. पी. एन. कदम यांनी व्यक्त केले.

संकल्प मानव संसाधन विकास संस्थेने युवा दिनानिमित्त ‘मनावर ताबा, तर जगावर ताबा’ या विषयावर वेब सेमिनारचे आयोजन केले होते. यावेळी आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा भोजकर, शेफ अभिजीत डोंबे उपस्थित होते.

तरुणांच्या मनात काय आहे, हे जाणून घेऊन त्यांना सकारात्मक दिशेने नेण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. अनेक तरुण इतरांना काय वाटेल याचा विचार करून आपले करिअर निवडतात. त्यातून अनेकदा नैराश्य येते आणि तरुणांच्या मनात आत्महत्येसारखे विचार येतात. हे टाळण्यासाठी आवडणाऱ्या क्षेत्रांमध्ये काम करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. आपले ध्येय तरुणांनी निश्चित केले पाहिजे. आपले आयुष्य ही आपली निवड आहे त्यामुळे त्यासाठी कोणते निर्णय घ्यायचे याचा विचारही आपणच केला पाहिजे. ध्येयपूर्तीसाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी असेल तर माणूस नक्कीच यशस्वी होतो, असे डॉ. कदम यांनी यावेळेस सांगितले.

आपल्या अयुष्यात दररोज भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकत असतो. डॉ. पी. एन. कदम हे माझ्या आयुष्यात एक प्रकारे टर्निंग पॉईंट ठरले. त्यामुळे माझ्या आयुष्यात सकारात्मक उर्जा निर्माण झाली. इतरांना दोष देण्यापेक्षा आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण स्वत: घेतली पाहिजे, असे डॉ. मनीषा भोजकर म्हणाल्या.

कॉलेजमध्ये शिकत असताना पुढे काय करायचे याबद्द्ल काही ठोस निर्णय घेतला नव्हता. मी अनेक नकारात्मक विचार करत होतो. डो. कदम यांच्या संपर्कात आल्यानंतर व त्यांचे विचार ऐकल्यावर माझ्यात सकारात्मक बदल झाला. त्यानंतर मी मला आवडणाऱ्या पाककला या क्षेत्राचा करियर म्हणून विचार करू लागलो आणि त्यात मला यश मिळाले, असे अभिषेक डोंबे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.