Pune News: उद्यापासून अशत: लॉकडाऊन; काय सुरु काय बंद?

एमपीसी न्यूज – शनिवारपासून (दि. 3 एप्रिल) पुण्यात बारा तासांचा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू लागू राहणार आहे. शनिवारपासून बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. उद्यापासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील.

अजित पवार म्हणाले ‘मी पण लॉकडाऊनच्या विरोधात आहे, पण संख्या ज्या पद्धतीने वाढते आहे त्या पद्धतीने शंभर टक्के हाॅस्पिटल ताब्यात घेतले तरी बेड मिळणे कठीण आहे. एखाद्या घरात कोरोना रुग्ण असेल तरी त्या घरातील इतर लोक गावभर फिरतात त्याचा काही उपयोग होत नाही. संख्या आवाक्याबाहेर गेली तर अजित पवार यांना फोन केला तरी बेड मिळायचे नाही त्या वेळी काय करणार? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, ‘परिस्थिती बिकट होत चालली आहे. पॉझिटिव्ह रेट 32 टक्क्यांपेक्षा जास्त झालाय. रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 8 हजारांवर गेला आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे. रुग्ण वाढले तर खासगी हॉस्पिटलला कोरोना हॉस्पिटल करावे लागेल. पेशंट असे वाढत राहिले तर काही हॉस्पिटल हे 100 टक्के कोरोना हॉस्पिटल करावे लागतील.’

‘बेडची संख्या वाढवणार, टेस्टिंग वाढवलं जाईल. पुण्यामध्ये इतर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. लसीकरणाचा वेग वाढवणार, मागील दहा दिवसांत राज्यात पुणे शहरात सर्वाधिक लसीकरण झाले. पुढील दोन दिवसात 75 ते 80 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. येत्या 3 ते 4 दिवसात 1 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट असल्याचे राव म्हणाले.

पुण्यात काय सुरु आणि काय बंद?

– सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील.

– मॉल आणि सिनेमा हॉल सात दिवसांसाठी बंद

– धार्मिक स्थळं सात दिवसांसाठी बंद

– PMPML बससेवा सात दिवस बंद, केवळ अत्यावश्यक सेवा सुरु

– आठवडे बाजारही बंद

– लग्न आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत

संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील

– लग्नाला 50 तर, अंत्यविधीसाठी 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी

– दिवसभर जमावबंदी

– जिम सुरु राहणार

– दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार

– शाळा महाविद्यालये 30 एप्रिलपर्यंत बंद

– हॉटेलची पार्सल सेवा सुरू राहणार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.