Pune News : मराठा आरक्षणाबाबत नुसत्या पोकळ घोषणा नको – विनायक मेटे

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात केवळ पोकळ घोषणा केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण उद्धव ठाकरेंना टिकवता आले नाही. ज्या विद्यार्थ्यांची सरकारी नोकरीत निवड झाली त्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत सरकारला नोकऱ्या देत आल्या नाहीत. उद्धव ठाकरे फक्त घोषणा देत आहेत. केवळ बोलण्यापेक्षा त्यांनी करून दाखवावे असे म्हणत शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी झालेल्या नोकरभरतीतील उमेदवारांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिवसंग्रामच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मेटे म्हणाले, आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी जानेवारी 19 ते मार्च 20 या कालावधीत 20 विभागांनी नोकरभरती प्रक्रिया राबवली. 9 तारखेला आरक्षणाला स्थगिती मिळाल्यावर सरकारने सर्व विद्यार्थ्यांना रुजू होण्यास नकार दिला आहे. या विद्यार्थ्यांवर घोर अन्याय शासनाने केला आहे. असे साडेतीन ते चार हजार विद्यार्थी आहेत. काही शब्दांचे चुकीचे अर्थ काढून मुलांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचे काम मंत्रालयातील काही मंत्री व प्रशासनातील काही अधिकारी करत आहेत. त्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बळी पडत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.