Pune News : आझाद मैदानावरील शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा : उपमुख्यमंत्री अजित पवार
एमपीसी न्यूज : आम्ही राज्यातील आंदोलक शेतकऱ्यांना विनंती केली होती की आपण जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयाच्या ठिकाणी आंदोलन करावे. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना द्यावे असे सांगितले होते. पण सर्व शेतकरी आझाद मैदानावर आंदोलन करत असून आमचाही त्यांना पाठिंबा असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
पुणे विधानभवनात (कौन्सिल हॉल) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, दिल्ली येथे शेतकर्यांचे कृषी कायद्या विरोधात जे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलना समोर केंद्र सरकार झुकले. त्याची दखल न्यायालयाला देखील घ्यावी लागली आणि स्थगिती द्यावी लागली आहे. आता राज्यात मुंबई येथे शेतकरी आंदोलन करीत आहे. पण आपल्या देशात कोरोना आजाराचे संकट असताना.
आम्ही राज्यातील आंदोलकांना विनंती केली होती की, आपण जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय या ठिकाणी आंदोलन करावे. आपल्या मागण्याचे निवेदन त्यांना द्यावे असे सांगितले होते. पण आज ते मुंबईत आंदोलनासाठी दाखल झाले आहे. आज एक सांगतो आम्ही कायदा पास झाल्या पासून त्यांच्या विरोधात आहोत आणि यापुढे देखील राहणार आहोत.
तसेच राज्य सरकारने कृषी कायदा अंमलात आणण्यास स्थगिती दिली आहे. आतापर्यंत आंदोलका समवेत 12 बैठका झाल्या आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आजच्या आणि दिल्लीतील आंदोलनास महाविकास आघाडीसह घटक पक्षांचा पाठिंबा आहे. तसेच शेतकर्यांच्या हिताचे, सन्मानाचे, आधारभूत किंमत देण्यासंदर्भात निर्णय केंद्र सरकारने घेतले पाहिजे. तसेच कायदे देखील त्या स्वरूपाचे करावेत. अशी आमची सुरुवातीपासून आणि आज देखील तीच भूमिका आहे. शेतकर्यांना अडचणीत आणणार्या कायद्याला आमचं समर्थन नसणार आमची ही भूमिका आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
…मग ज्या त्या वेळी काय करायचं ते जाहीरपणे सांगितले जाईल : अजित पवार
मला काल शिवेंद्रसिंहराजे भेटले, आज परिचारक भेटले. हे जरी वेगळ्या राजकीय पक्षात असले तरी मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री आहे.
ज्या त्या वेळी काय करायचं ते जाहीरपणे सांगितले जाईल. आता अमुक अमुक त्या त्या पक्षात येतायत, मग वाजवा किती वाजवायच ते, असा अप्रत्यक्ष टोला भाजपला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.
पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मी उपमुख्यमंत्री पदावर असल्यामुळे मला सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी भेटतात. सोलापूर जिल्ह्याचे एक शिष्टमंडळ आले होते. त्यामध्ये शहाजी बापू, दिपक साळुंके आले होते. असे अनेक मान्यवर आले होते. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्याबद्दल आज वेळ घेतली होती. त्यांचे काही पाणी वाटपाबाबत समस्या होत्या. त्यामुळे ते आले होते. शेवटी आम्ही देखील विरोधी पक्षामध्ये असताना. आमची काम असताना पालकमंत्री गिरीश बापट यांना भेटत होतो. आम्ही संबधित मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना भेटायचो. ही परंपरा आजच नाही. तर स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबापासून चालत आलेली आहे. त्याला काही वेगळ स्वरुप देण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.