Pune News : विविध जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन विचारविनिमय केला पाहिजे- नागनाथ कोतापल्ले

एमपीसी न्यूज: पूर्वी वेगवेगळ्या विचारधारांच्या चळवळी देशात कार्यरत होत्या. प्रत्येकाला एकमेकांच्या चळवळीविषयी आदर होता. त्यात कडवेपणा नव्ह्ता. मात्र, काळाच्या ओघात हा उदारपणा टिकून राहू शकला नाही. विविध जाती-धर्मातील विचारवंतांनी एकत्र येऊन विचारविनिमय केला पाहिजे. तरुणांनी साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात पुढे येऊन लिहिते झाले पहिजे, असे मत नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा, पुणे आणि लोकमंगल गृप शिक्षण संस्था, सातारा यांनी संयुक्तपणे आयोजित ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, विचारवंत व वक्ते स्व. डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा स्मृतिदिन व पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक गिरीष प्रभुणे व प्रा. संभाजी मलघे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कोतापल्ले उपस्थित होते.

इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांना ‘आचार्यदर्शन’ या ग्रंथासाठी आणि प्रा. जे.पी. देसाई यांना ‘माझी भाषणे, प्रसंग आणि आठवणी’ या ग्रंथासाठी साहित्य पुरस्कार, तर पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांना सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन इटकर, अध्यक्ष उद्धव कानडे उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे, लोकमंगल गृप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस आदी उपस्थित होते.

आज महाराष्ट्रातली जातीय स्थिती विदारक आहे. जातीय कट्टरपणा वाढत चालला असून परस्परांबद्दल द्वेष निर्माण होत आहे. समाजात कायम अशांतता निर्माण होईल, अशा घटना घडणे राष्ट्रहितासाठी घातक आहे. तसेच डॉ. संभाजी मलघे यांसारखे अभ्यासू लोक साहित्य क्षेत्रात पुढे येत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट असल्याचे डॉ. कोतापल्ले यांनी सांगितले.

साहित्य क्षेत्रात गरीब व होतकरू मुले पुढे येत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र अशा तरुणांना अर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. समाजात आदर्शवत काम करणा-या व्यक्तींवर लेखन होण्याची गरज आहे. आजच्या डिजीटल पिढीला ‘आचार्यदर्शन’ पुस्तक नक्कीच उपयोगी ठरेल, असे डॉ. मलघे म्हणाले.

समाजातील विचारवंतांनी डावे-उजवे आदी सर्व भेद, भाव, द्वेष, कल दूर सारून समान व्यासपीठावर एकत्र येऊन समाजाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले पाहिजे आणि पु.शि.रेगे, भालचंद्र नेमाडे, नागनाथ कोतापल्ले यांसारख्या साहित्यिकांचे विपुल साहित्य वाचनात आल्याने माझ्या दृष्टीकोनाला सामाजिक कंगोरे मिळाले असल्याचे अनुक्रमे गिरीष प्रभुणे व प्रा. मिलिंद जोशी म्हणाले.

प्रा. जे. पी. देसाई आणि सुदाम भोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी, सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी, तर सचिन ईटकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.