Pune News : कृषी विधेयकाविरोधात 22 डिसेंबरला ‘बीकेसी’मधील अंबानी इस्टेटवर मोर्चा काढणार : राजू शेट्टी

एमपीसी न्यूज : केंद्राच्या कृषी विधेयका विरोधात दिल्ली येथे मागील 20 दिवसापासून शेतकरी ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल केंद्र सरकार घेत नाही. तसेच ज्या अंबानी आणि अदानी यांच्यासाठी कृषी विधेयक आणले आहे. त्यांच्या निषेधार्थ 22 डिसेंबरला मुंबईतील उपजिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीमधील अंबानी इस्टेटवर मोर्चा काढला जाणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटत असून आजअखेर आंदोलनाच्या ठिकाणी जवळपास तीस शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे.

त्या पार्श्वभूमीवर 20 डिसेंबर रोजी संध्याकाळी प्रत्येक गावामध्ये मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यावेळी आंदोलन यशस्वी करण्याची शपथ घेतली जाणार आहे.

त्याच्याच पुढच्या टप्प्यात आम्ही 22 डिसेंबरला मुंबईतील उपजिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीमधील अंबानी इस्टेटवर मोर्चा काढला जाणार आहे.

पण ज्या अंबानी आणि अदानी यांच्यासाठी कृषी विधेयक आणले आहे. त्या दोघांमधील अनिल अंबानी हे जगात पहिल्या पाच श्रीमंतांच्या यादीत येत आहे. त्यामुळे त्यांना आम्हाला एकच विचारायचे आहे की ‘बाबा तुझी नेमकी भूक तरी किती आहे’, हे एकदाचे सांगून तरी टाक’ हे आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून विचारणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील आंदोलनात सहभागी व्हावे…

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील शेतकर्‍यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. ते आंदोलन देखील करणार आहेत. त्यावर शेट्टी म्हणाले की, आपले जे काही वैचारिक मतभेद असतील ते नंतर पाहू, पण आपल्या शेतकर्‍यांसाठी सर्वांनी एकत्र यावे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. त्यांचे स्वागत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.