Pune News: अयोध्येचे श्री राम मंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल – गोविंददेव गिरी महाराज

एमपीसी न्यूज – अयोध्येचे श्री राम मंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल, असे मत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले. मंदिर निर्माणाच्या महान कार्यासाठी अर्थसंकलन करण्यासाठी मकर संक्रांतीपासून माघ पौर्णिमेपर्यंत म्हणजे 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी 2021 पर्यंत “निधी समर्पण अभियाना’चा आरंभ होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने उभारणी होत असलेल्या राम मंदिराचे कार्य आता गतिमान झाले आहे. सुमारे पाच शतके चाललेला रामभक्तांचा संघर्ष यशस्वी होऊन 9 नोव्हेंबर 2019 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सत्याचा पूर्णपणे स्वीकार करून मंदिराचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयानुसार भारताच्या केंद्र शासनाने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना केली.

न्यासाच्या विनंतीवरून पंतप्रधानांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी श्री रामजन्मभूमीच्या जागी भूमिपूजन व शिलापूजन करून कार्याचा श्री गणेशा केला. संपूर्ण देश आणि जगातील सर्व रामभक्तांचे नेत्र त्या दिव्य दृश्याकडे लागले होते. कोट्यवधी नेत्र सजल बनले होते, असे गोविंदगिरी महाराज म्हणाले,

असे असेल राम मंदिर !

प्रस्तावित निर्माणाधीन मंदिर तीन मजल्यांचे असेल. प्रत्येक मजल्याची उंची 20 फूटांची असेल. मंदिराची एकूण उंची 161 फूट असेल, लांबी 360 फूट आणि रूंदी 235 फूट असेल. त्यावर पाच शिखर असतील. तीन मजल्यांमध्ये मिळून एकूण 160 स्तंभ लागतील. हे मंदिर 2.7 एकर जागेवर होईल. त्याचे संपूर्ण बांधकाम केवळ दगडांनी असेल. सिमेंट व लोखंडाचा वापर यात होणार नाही .

मंदिर परकोटाच्या बाहेर सुमारे 108 एकर जागेवर यज्ञशाळा, सत्संग भवन, संग्रहालय, संशोधन केंद्र, प्रदर्शन, अतिथी भवन इत्यादी सर्व अत्याधुनिक सोई-सुविधा होतील. मंदिर बांधकामाचे वास्तुकार मे. चंद्रकांत सोमपुरा, बांधकामकर्ता मे. लार्सन अँड टूब्रो तसेच व्यवस्थापन सल्लागार म्हणून मे. टाटा कंसल्टिंग इंजिनियर्स यांना निश्चित करण्यात आले आहे. एकूण तीन ते साडे तीन वर्षांच्या अवधीत हे कार्य पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पायाभरणीसाठीसुद्धा तज्ञ समितीच्या मार्गदर्शनानुसार दगडांचाच वापर होईल. मंदिराच्या बांधकामाच्या अनुषंगानेच श्री अयोध्येचे विकास कार्यसुद्धा सुरू झाले आहे. बांधकामानंतर आधी संपूर्ण भारत देश, नंतर जवळपासचे आशियाई देश व त्यानंतर संपूर्ण जगातील रामभक्तांचा संपर्क, समन्वय, सहयोग आणि समरसतेच्या केंद्राच्या रूपात ती पुढे येऊन जगाच्या सांस्कृतिक राजधानीचे स्वरूप तिला येईल, असा आमचा प्रयत्न असेल, असे गोविंदगिरी महाराज यांनी सांगितले.

या महान कार्यासाठी अर्थसंकलन करण्यासाठी मकर संक्रांतीपासून माघ पौर्णिमेपर्यंत म्हणजे 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी 2021 पर्यंत “निधी समर्पण अभियाना’चा आरंभ होत आहे. या माध्यमातून देशातील चार लाख गाव तसेच 11 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले आहे. पावती पुस्तके आहेतच. तसेच 1000/-, 100/- आणि 10/- रुपयांच्या कूपन्सच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली.

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या अभियानाची माहिती दिली. पत्रकार परिषदेला रा.स्व. संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, प्रांत अभियान प्रमुख संजय मुदराळे, प्रांत अभियान सहप्रमुख मिलींद देशपांडे, पुणे महानगर अभियान सहप्रमुख महेश पोहनेरकर उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.