Pune University News : आपल्या एकतेचे मूळ भारतीय संस्कृतीत – राज्यपाल आरिफ मोहम्मद खान

एमपीसी न्यूज – भारताची ओळख ही केवळ येथील वंश, भाषा व जाती यांवर आधारित नाही, तर ती एकात्म संस्कृतीतून निर्माण झाली आहे, असे मत केरळ राज्याचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ‘भारतीय एकतेची मूलभूत तत्त्वे’ या विषयावर आरिफ मोहम्मद खान बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई आदी या वेळी उपस्थित होते.

आरिफ मोहम्मद खान म्हणाले, ” भारतीय संस्कृती सर्व प्राणिमात्रांना समान प्रतिष्ठा देते. या संस्कृतीची मुळे वेद व उपनिषदांमध्ये आहेत. नवीन पिढीने हा सांस्कृतिक ठेवा वृद्धिंगत केला पाहिजे.”

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, “भारतीय प्रबोधनात आणि शैक्षणिक क्षेत्रात पुण्याचे मौलिक योगदान आहे. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, नामदार गोखले यांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तींचा पुण्याला वारसा आहे आणि तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुढे चालवत आहे. ”

या वेळी डॉ. करमळकर यांनी विद्यापीठाच्या अनेकविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शांतिश्री पंडित यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.