Pune News : छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे, तर जगाचे हिरो – भगतसिंह कोश्यारी
एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल साम्राज्याचा शेवट करत हिंदूची स्थापना करण्यासाठी युक्ती, बुद्धी आणि शक्तीचा त्रिवेणी संगम घालून राज्य केले. देशात एक प्रकारची नवीन चेतना निर्माण केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे, तर जगाचे ‘हिरो’ आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.
या वेळी आमदार भीमराव तापकीर, आमदार मुक्ता टिळक, राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी, उपवनसंरक्षक राहूल पाटील, पुरातत्व खात्याचे सहायक संचालक विलास वाहने, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आमचे अभिमान व स्वाभिमान आहेत. त्यांच्या सारख्या इतर थोर राष्ट्रपुरुषांबद्दल बालकांना सुरुवातीपासून शिक्षण दिले पाहिजे. नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास तसेच त्यांच्या त्याग व बलिदानाबद्दल बालकांना शिक्षण दिल्यास आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराज व नरवीर तानाजी मालुसरे घडतील.
राज्यपाल कोश्यारी यांनी सुरवातीला लोकमान्य टिळक यांच्या विश्रामधामास भेट देवून माहिती घेतली. त्यानंतर नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यांना सिंहगड व परिसराची माहिती डॉ. नंदकिशोर मते यांनी दिली.