Pune : सर्जिकल स्ट्राईकमुळे भारतीय सैन्याची धमक पाकिस्तानला समजली- लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर

लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना थोरले बाजीराव पेशवेशौर्य पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज- सर्जिकल स्ट्राईक ही भारतीय सैन्याची अतिशय यशस्वी मोहीम होती. सर्जिकल स्ट्राईक नंतर भारतीय सैन्य काय करु शकते हे आपण जगाला दाखवून दिले. पाकिस्तानला आपण दाखवून दिले की भारत फक्त पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने थांबवित नाही किंवा समझोता एक्सप्रेस बंद करीत नाही. जर कोणी हल्ला केला, तर प्रत्युत्तर सुध्दा भारताला देता येते. असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी काढले.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 318 व्या जयंतीनिमित्त थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे घोले रस्त्यावरील नेहरु सांस्कृतिक सभागृहात थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना निभोरकर बोलत होते.

यावेळी पेशवे यांचे वंशज श्रीमंत उदयसिंह पेशवा, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले, अनिल गानू, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, उपस्थित होते. सन्मानचिन्ह, पेशवाई पगडी, 25 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

राजेंद्र निंभोरकर म्हणाले, ” मराठ्यांचा इतिहास म्हणजे केवळ पानीपतची लढाई मराठे हरले, एवढाच लोकांना माहीत आहे. परंतु केवळ पानीपतपर्यंत मराठ्यांचा इतिहास नाही. मराठ्यांचा संपूर्ण इतिहास जगासमोर यायला हवा. सर्जिकल स्ट्राईक ही भारतीय सैन्याची अतिशय यशस्वी मोहिम होती. बऱ्याच जणांनी विचारले की सर्जिकल स्ट्राईक नंतर काय साधले ? सर्जिकल स्ट्राईक नंतर भारतीय सैन्य काय करु शकते हे आपण जगाला दाखवून दिले. पाकिस्तानला आपण दाखवून दिले की भारत फक्त पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने थांबवित नाही किंवा समझोता एक्सप्रेस बंद करीत नाही. जर कोणी हल्ला केला, तर प्रत्युत्तर सुध्दा भारताला देता येते. या मोहिमेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताला कोणी प्रश्न विचारला नाही. भारतीय सैन्य काम करुन दाखवेल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

मनोहर जोशी म्हणाले, “राजेंद्र निंभोरकर यांच्या सारख्या सिन्याधिकाऱ्याचा सन्मान करणे हा माझा धर्म आहे. त्यांचा सन्मान अनेकांना स्फूर्ती देणारा आहे. आयुष्यात मोठे होण्यासाठी ध्येय लागते, ध्येय समोर ठेवूनच वाटचाल करायला हवी. आपण केवळ बोलू शकतो किंवा घुसखोरी करतो असे पाकिस्तानला माहित होते. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरील यंत्रणा करेल अशी मोहीम भारतीय लष्कराने केली. मृत्युची पर्वा न करता सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक केले. शिस्त आणि राष्ट्रवाद शिकण्यासाठी सैन्यात जायला हवे. राष्ट्रवाद वाढणे ही देशाची गरज आहे. प्रत्येकाच्या अंत:करणात राष्ट्रवाद असायला हवा. जवान स्वत:च्या घराची आणि आपल्या जिवाची पर्वा न करता, प्राण पणाला लावून देशाचे रक्षण करतात. त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित राहतो. पराक्रमाची परिसीमा म्हणजे सैन्यदलातील नोकरी आहे, असे जोशी म्हणाले.

भूषण गोखले म्हणाले, “महाराष्ट्रापुरते संकुचित न राहता, मराठ्यांचा इतिहास संपूर्ण जगासमोर आणला पाहिजे. मराठ्यांचा पूर्ण इतिहास जगासमोर आला नाही. तरुणाईने मराठ्यांच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करुन योग्य इतिहास जगासमोर आणला पाहिजे. पुण्याचे विमानतळ किंवा रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यायला हवे, यातून लोकांना प्रेरणा मिळेल” असेही त्यांनी सांगितले.

सुमेधा चिथडे यांनी सूत्रसंचालन केले. कुंदनकुमार साठे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत नगरकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.