Pune : स्वतःसाठी वाजवा, लोकांना आवडेल – पं. बसंत काब्रा

एमपीसी न्यूज – स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी वाजवा. स्वतःला जे वाटते, तेच वाजवले पाहिजे, लोकांना हळूहळू ते आवडू लागेल, असे मत सरोदवादक पंडित वसंत काब्रा यांनी व्यक्त केले. ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’मध्ये ‘अंतरंग’ या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’मध्ये ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणा-या ‘अंतरंग’ या कार्यक्रमामध्ये यावर्षी दिवंगत सतारवादक अन्नपूर्णादेवी यांचे शिष्य व सरोदवादक पं. बसंत काब्रा यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. मंगेश वाघमारे यांनी बसंत काब्रा यांची मुलाखत घेतली. गणेशखिंड रस्त्यावरील राहुल थिएटरजवळील सवाई गंधर्व स्मारकामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी हे देखील उपस्थित होते.

काब्रा यांनी श्रोत्यांशी सवादन संवाद साधला. ते म्हणाले, “संगीतामध्ये खूप शक्ती आहे, मात्र त्यामध्ये मन आणि भावना असणे गरजेचे आहे. पूर्वी लोक संगीतासाठी वेडे व्हायचे, लोकांकडे चांगल्या संगीतासाठी वेळ होता. कलाकारांमध्ये आदानप्रदान व्हायचे. आता या गोष्टी बदलल्या आहेत. आता संगीताच्या सूरांतील ताकद संपत चालली आहे. लोकांना जे आवडेल, ते वाजवण्याकडे कल वाढला आहे. मात्र चांगले शिकले पाहिजे. रियाझ केला पाहिजे. स्वतःला जे आवडेल,तेच वाजवले पाहिजेल. ते लोकांना आपोआप आवडू लागेल.”

घरामध्येच संगीताची परंपरा होती. वडील, काका वाजवायचे. घरी सतत सरोद ऐकू यायची. अली अकबर खॉं यांचे येणे जाणे होते. त्यामुळे पुढे अन्नपूर्णा देवी अर्थात गुरु माँ यांच्याकडे शिष्य म्हणून दाखल झाल्याचे काब्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, “अन्नपूर्णा देवी यांना संगीत म्हणजे, पूजा वाटायची. त्या म्हणायच्या, राग हे मंत्रासारखे वाजवले, म्हंटले पाहिजेत. त्यांचा शिस्तीवर भर होता. अगोदर माहित असलेले सगळे विसरायला अन्नपूर्णा देवी यांनी सांगितले आणि पुढे ‘यमन’ रागापासून शिक्षण सुरु झाले.”

भारतीय शास्त्रीय संगीत, हे ऐकून काय चांगले असते, हे कळेल, मात्र ते आत्मसात करता येणार नाही. त्यासाठी गुरूकडूनच शिकले पाहिजे, असेही काब्रा यांनी सांगितले. यावेळी पं. काब्रा यांनी मालकंस, मारवा रागातील काही तुकडे सरोदवर सादर केले.

यावेळी ‘षड्ज’ या कार्यक्रमांतर्गत, दिग्दर्शक एस. बी. नयमपल्ली यांनी दिग्दर्शित केलेला ‘पं. विष्णू दिगंबर पलुस्कर’ हा माहितीपट आणि ‘पं. बिरजू महाराज’, हा चिदानंद दासगुप्ता दिग्दर्शित फिल्म डिव्हिजनने तयार केलेले माहितीपट दाखविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.