Pune : टांगेवाला कॉलनीतील नागरिकांचे पुनर्वसन करा- आम आदमी पक्षाची मागणी
एमपीसी न्यूज – नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे टांगेवाला कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्यामुळे या कॉलनीतील नागरिकांचे पुनर्वसन करा, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
टांगेवाला ही कॉलनी पानशेत पूरग्रस्तांची आहे. गेल्या वीस वर्षापासून तिथे शेकडो कुटुंबे राहत आहेत. ढगफुटीमुळे या वस्तीमध्ये आंबील ओढ्याचे पाणी शिरले. 5 जण वाहून गेले. यात 1 महिला व 2 बालकांचा समावेश आहे. पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला. प्रशासकीय गलथानपणाचा फटका नागरिकांना जीवानिशी बसला.
काल व आज आम आदमी पक्षाचे पार्वती मतदारसंघाचे उमेदवार संदीप सोनवणे यांनी पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर टांगेवाला कॉलनीतील नागरिकांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करा, अशी मागणी केली आहे. याबाबत उद्या ते पुणे मनपा आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.