Pune : आंबेगाव येथे सिंहगड कॉलेजची सीमाभिंत कोसळून सहाजण मृत्युमुखी, तिघे जखमी

कोंढवा दुर्घटनेची पुनरावृत्ती, मजुरांच्या झोपड्यांवर घाला

एमपीसी न्यूज – मुसळधार पावसामुळे आंबेगाव येथील सिंहगड कॉलेजची सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळून मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेत सहाजण मृत्युमुखी पडले असून तिघेजण जखमी झाले आहेत. तब्बल 15 जणांचा बळी घेणारी कोंढव्याची दुर्घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती आंबेगाव येथे घडली आहे.

या घटनेमध्ये राधेलाल पटेल(वय 25), जेटू लाल पटेल ( वय 50), ममता राधेलाल पटेल ( वय 22), जितू चंदन रवते ( वय 24), जेटूलाल पटेल( वय 45), ममता पटेल ( वय 24). मृत्युमुखी पडलेले सर्व मजूर छत्तीसगड राज्यातील आहेत.

आंबेगाव येथील सिंहगड कॅम्पसच्या सीमाभिंतीलगत मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या होत्या. सर्वजण गाढ झोपेत असताना हा सीमाभिंत अचानक कोसळली आणि त्याखाली मजुरांच्या झोपड्या गाडल्या गेल्या. पडलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली मजूर आणि त्यांचे कुटुंबीय अडकून पडले.

दुर्घटनेचे वृत्त समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. अग्निशामक दलाने सहा पुरुष व तीन महिलांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. त्यापैकी सहाजणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 पुरुष व 2 महिलांचा समावेश. याठिकाणचे शोधकार्य थांबवण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेला नैसर्गिक आपत्ती आणि मानवी चूक दोन्ही जबाबदार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, ” कोंढवा येथील दुर्घटना घडल्यानंतर पुणे महापालिकेतर्फे शहरातील अशा धोकादायक ठिकाणच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली. त्यामध्ये 287 ठिकाणाची माहिती घेऊन 6 हजार झोपड्या स्थलांतरित करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र दुर्दैवाने या ठिकाणचे सर्वेक्षण करण्यापूर्वीच ही घटना घडली. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.