Pune Water : पुणेकरांकडे दीड वर्ष चालेल एवढा पाणीसाठा; चारही धरण भरले पूर्ण क्षमतेने!
एमपीसी न्यूज : खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील (Pune Water) चारही धरणे यंदा पूर्ण क्षमतेने भरली आहेत. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून यंदा 23.05 टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे. शहराला दरमहा 1.24 – 1.5 टीएमसी पाण्याची गरज असते. त्यानुसार आतापर्यंत शहराला दीड वर्षे पुरेल एवढे पाणी साचले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमध्ये सध्या 29.08 टीएमसी म्हणजेच 99.77 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. यंदा मान्सूनपूर्व पावसाने धरणक्षेत्रात हजेरी लावली नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला होता.
या पार्श्वभूमीवर पुणे शहरावर पाणीकपातीची वेळ आली असून, पाणीकपातीच्या निर्णयाची अंमलबजावणीही 4 जुलैपासून सुरू झाली होती. मात्र, त्यानंतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत शहर व जिल्ह्याला पिण्याच्या व शेतीसाठी पाण्याची चिंता करावी लागणार नाही.
दरम्यान, या हंगामात 12 जुलै रोजी खडकवासला धरण (Pune Water) पूर्ण क्षमतेने भरले असून, या धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर 11 ऑगस्टला पानशेत धरण 100 टक्के भरले होते, तर वरसगाव धरण 13 ऑगस्टला 100 टक्के भरले होते. त्यामुळे या तिन्ही धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती.
पावसाने आता पुनरागमन केले असले, तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांमधून पाणी सोडणे सध्या बंद आहे. आतापर्यंत 23.05 टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले आहे.