Pune : विधान परिषद निवडणूक; अखेर काँग्रेसने एका जागेवरच समाधान मानले
एमपीसी न्यूज ; विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नव्या उमेदवाराला संधी दिली. परंतु, काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानले. यामध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते शिष्टाईत कमी पडले, असे मत पक्षात व्यक्त होत आहे.
विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होत आहे. विधीमंडळातील संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीच्या पाच जागा निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन जागा लढवणार असून त्यांचे उमेदवार निश्चित झाले आहेत.
शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उमेदवारी निश्चित आहे. अशा वेळी काँग्रेस पक्षाने दोन जागांवर उमेदवार द्यायला हवे होते, अशी अनेकांची इच्छा होती.
शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद आहे. राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्री पद, अर्थ खाते, गृह खाते अशी अनेक वजनदार खाती आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाने दोन जागांसाठी आग्रही राहायला हवं होते, अशी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांची मनिषा होती. पण, काँग्रेसने एका जागेवरच समाधान मानले.
काँग्रेसने रमेश राठोड या युवकाला संधी दिली आहे. भाजप प्रमाणे काँग्रेसनेही नवीन चेहरा दिला याबद्द्ल मात्र पक्षात समाधान आहे.