Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’चा देशात सकारात्मक परिणाम दिसेल
एमपीसी न्यूज : (गौरव चौधरी) – कन्याकुमारीपासून काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 रोजी भारत जोडो यात्रेला ( Bharat Jodo Yatra ) सुरुवात केली. भारतीय राजकारणात एक इतिहास या भारत जोडो यात्रेचा होणार आहे. राजकीय पक्षाची सर्वात मोठी पदयात्रा म्हणून याकडे पाहिले जात आहे. तब्बल 150 दिवस भारताला दोन टोकापर्यंत जोडणारे कन्याकुमारी ते कश्मीर असा 3500 किलोमीटरचा प्रवास हा 12 राज्यातून ही यात्रा चालून करणार आहे.
2014 पासून देशात मोदी सरकार आल्यापासून देशात राजकारणाची दिशा ही वेगळ्याच स्वरूपात पाहायला मिळत आहे. एका धर्माचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. पाशवी बहुमताच्या जोरावर लोकशाहीला घातक असे अनेक प्रयत्न विविध राज्यांमध्ये सत्ता स्थापनेसाठी केले जात आहेत. देशात दिवसेंदिवस वाढती बेरोजगारी, प्रचंड उफाळून आलेली महागाई, महिला अत्याचार, तुटपुंजी परदेशी गुंतवणूक, अनेक सरकारी संस्थांचे खाजगीकरण आणि नुकताच येऊन गेलेला कोविड सारखा जागतिक महामारीचा आजार यामुळे देशातील वातावरण नकारात्मक दिशेला जात असताना सामान्य माणसाच्या हाकेला साथ देत एकसंघ होण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून ते अनेकांना साद घालत आहेत.
राहुल गांधी यांच्यासोबत, पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या समवेत सामाजिक चळवळी त्यातील कार्यकर्ते, लेखक आणि कलाकार हे देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत आहेत. आणि छोट्या मोठ्या पक्षांचे या रॅलीला समर्थन आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक, महिला, तरुण, विविध वयोगटातील नागरिक अतिशय आनंदाने हजारोंच्या संख्येने सहभागी होताना या रॅलीमध्ये दिसत आहेत. राहुल गांधी हे दिव्यांग, छोटे दुकानदार, मजूर, मच्छीमार, ऑटो चालक, अंगणवाडी सेवेकरी अशा विविध घटकांची निगडित असलेल्या लोकांसोबत संवाद साधत आहेत. येणाऱ्या यात्रेची तासंतास वाट पाहत उभा असलेला जनसमुदाय पहावयास मिळत आहे.
MPC News Quiz Result 3 : ‘देवीचा जागर प्रश्नमंजुषा – दिवस तिसरा… जाणून घ्या विजेत्याचे नाव !
देशातील सध्याच्या सरकारमध्ये असलेल्या ( Bharat Jodo Yatra ) पक्षाने आधी यात्रेची खिल्ली उडवली, पण आज ही यात्रा त्यांना डोईजड होत आहे. यात्रेचा उद्देश ‘भारत जोडो यात्रा’ हे भारताच्या सर्व समावेशक लोकशाहीचे समर्थन करण्यासाठी अन्याय, असमानता आणि असहिष्णुतेच्या विरोधात लोकांना संघटित करण्याचे ध्येय आहे. तसेच, राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासाठी वचनबद्धता ही या यात्रेची व्यापक भूमिका आहे. बेरोजगारी आणि वाढती महागाईचा सामान्य जनतेला होणारा त्रास आज राहुल गांधी समजून घेताना दिसत आहेत. राहुल गांधींना यात्रेदरम्यान अतिशय चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे. राहुल यांच्यामध्ये लोक आपला मोठा भाऊ, मुलगा, नातू तर देशाचे नेतृत्व करू शकणारा आश्वासक चेहरा म्हणून राहुल गांधी यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांना भेटल्यावर त्यांच्यासोबत चालल्यानंतर लोकांच्या अतिशय बोलक्या प्रतिक्रिया आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आनंदी व समाधानाचे आहेत. अराजकता पसरलेल्या या देशात सत्तेचे केंद्रीकरण करून एका विशिष्ट समुदायाकडे घेऊन जाणाऱ्या राजकारणाला निश्चित या यात्रेने चपराक बसेल.
देशांमध्ये एकता, समता आणि धर्मनिरपेक्ष राज्यांची भावना अजून घट्ट होईल. संपूर्ण देशात एक राजकीय सकारात्मक परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. काँग्रेस मुक्त भारत हा बीजेपीच्या नाऱ्याला आव्हान देत देश जोडायला निघालेली भारत जोडो यात्रा ही काँग्रेस पक्षाला बळकटी प्राप्त करून देशात सकारात्मक बदल घडवून आणेल.
गौरव चौधरी
(लेखक – पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे सचिव आहेत.)