IPL 2020 : राजस्थानचा मुंबईवर आठ गडी राखून विजय

एमपीसी न्यूज –  राजस्थानने आठ गडी राखून मुंबईवर विजय मिळवला. किशन-सूर्यकुमार यांची संयमी भागीदारी आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाज 60 धावांच्या खेळीमुळे मुंबईच्या संघाने 20 षटकांत 195 धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरूवात खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन जोडीने नाबाद दीडशतकी भागीदारीमुळे दमदार विजय मिळवून दिला. राजस्थानच्या विजयामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान कायम राहिले असून चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले‌ आहे. 

 

 

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या संघाची  खराब सुरुवात झाली. धडाकेबाज खेळी करणारा क्विंटन डी-कॉक पहिल्याच षटकात बाद झाला. यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी 83 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. सूर्यकुमार यादवने 40 तर इशान किशनने 37 धावा केल्या. यानंतर शेवटच्या 4 षटकांत मुंबईने तुफान फटकेबाजी करत 72 धावा मारल्या. हार्दिक पांड्याने नाबाद राहत 21 चेंडूत 60 धावा केल्या.

 

 

मुंबईने दिलेल्या 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. जेम्स पॅटिन्सनने रॉबिन उथप्पा (13) आणि स्टीव्ह स्मिथ (11) या दोघांना स्वस्तात माघारी धाडलं. पण त्यानंतर बेन स्टोक्स आणि संजू सॅमसनने यांनी मुंबईच्या गोलंदाजांची प्रचंड धुलाई केली. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू दोघांचेही चेंडू स्टोक्स-सॅमसन जोडीने सीमारेषेपार पाठवले. या दोघांनी शतकी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. स्टोक्सने 60 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारासह नाबाद 107 धावा केल्या. तर संजून सॅमसनने 31 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 54 धावा करत त्याला उत्तम साथ दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.