Rajnath Singh on China: भारत-चीन सीमावादावर तोडगा निघेल – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
Rajnath Singh on China: India-China border dispute will be settled - Defence Minister Rajnath Singh
एमपीसी न्यूज – भारताला कधीच कोणत्याही देशासोबत युद्ध नको आहे. शेजारील राष्ट्रांसोबत आम्हाला चांगले संबंध ठेवायचे आहेत. भारत आणि चीनमध्ये पहिल्यापासूनच सीमेवर वाद होत आला आहे. गस्तीच्या वेळी अनेकदा चिनी आणि भारतीय सैन्यात वाद झाला आहे, मात्र यावेळची परिस्थिती थोडी वेगळी आहे. चीनसोबत चर्चा सुरू असून लवकरच यावर तोडगा काढला जाईल, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी ‘एबीपी न्यूज’ या वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ‘एबीपी न्यूज’ने विशेष मुलाखत घेतली. त्यावेळी भारत-चीन सीमेवरील वाढता तणाव देशाला युद्धकडे घेऊन चालला आहे का, या प्रश्नावर त्यांनी वरील उत्तर दिले.
भारत आपल्या सीमाभागात पायाभूत सुविधा, रस्ते तयार करत आहे. यावर चीनला आक्षेप आहे, मात्र सीमाभागात सुरक्षेसाठी, इथल्या नागरिकांना सुविधा मिळाव्यात म्हणून विकासकामे करणे हा देशाचा पूर्वीचाच निर्णय आहे. भारत आपल्या देशात काहीही करू शकतो. तो आमचा निर्णय आहे. चीन देखील त्यांच्या सीमाभागात काहीही करू शकतो. आमचं काहीचं म्हणणं नाही, असे उत्तर राजनाथ सिंह यांनी दिले.
अमेरिकेचे अध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांनी भारत-चीन सीमावादात मध्यस्थी करण्याची भूमिक मांडली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणतीच चर्चा झाली नसल्याचे माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. नेपाळ सोबत सुरू असलेल्या वादावर बोलताना ते म्हणाले, कुठे काही गैरसमज असतील तर ते चर्चेद्वारे नक्कीच दूर केले जातील.
लडाख सीमेवर लष्कराच्या तैनातीवरुन भारत आणि चीनमधला तणाव सध्या वाढलेला आहे. पण या सगळ्या प्रकरणात अमेरिका मात्र नाहक मध्यस्थीसाठी उतावळी झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ट्रम्प यांची याबाबत वक्तव्ये सुरुच होती. मोदींशी बातचीत न होताच त्यांच्या मनात काय चाललंय हे ट्रम्प यांनी जाहीर करुन टाकले होते. भारत आणि चीनमध्ये जो तणाव वाढला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे, असा प्रश्न विचारल्यावर ट्रम्प यांनी ‘मी मोदींशी बोललो, ते काही चीनवरुन चांगल्या मूडमध्ये दिसत नाहीत’ असे सांगून टाकले.