एमपीसी न्यूज – भारत 21 दिवसांसाठी लाॅकडाऊन करण्यात आलेला आहे. आणि सर्व नागरिकांना अनावश्यक बाहेर फिरण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे. मग घरात बसून काय करायचे असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. यावर केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाने उपाय काढला असून, रामायण ही नव्वदच्या दशकात गाजलेली मालिका दूरदर्शन वर पुन्हा प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या मालिकेचे प्रसारण राष्ट्रीय चॅनल दूरदर्शन (डीडी नॅशनल) वरून करण्यात येणार आहे. उद्या शनिवारी (दि.28) सकाळी मालिकेचा पहिला भाग दाखवण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी 9 ते 10 या वेळेत मालिकेचा एक भाग दाखवण्यात येणार असून रात्री 9 ते 10 या वेळेत मालिकेचा दुसरा भाग दाखवण्यात येणार असल्याची माहिती, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेल्या ही मालिका 1986-1988 दरम्यान प्रचंड गाजली होती. असं म्हटले जाते की, टीव्हीवर रामायण सुरू झाले की रस्ते ओस पडायचे आज रस्ते ओस पडले असताना रामायण पुन्हा सुरू होत आहे.