Ranbhaji 2022 : माॅडर्न महाविद्यालयात रानभाजी 2022 महोत्सव संपन्न
एमपीसी न्यूज : रानभाजीचा नैसर्गिक व जैविक वारसा पुढच्या पिढीपर्यंत जाणे व त्याचे जतन व्हावे, या भावनेतून गणेशखिंड माॅडर्न महाविद्यालयात निसर्ग सेवक संस्था पुणे, वारसा एथनिक नॉलेज हेरिटेज सोसायटी अंजनगाव सूर्जी व वनस्पती शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोजित केलेला रानभाजी 2022 (Ranbhaji 2022) महोत्सव पार पडला.
प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी निसर्ग सेवक संस्था यांच्याशी चर्चा करुन रानामधे उगवणाऱ्या रानभाज्यांचा परंपरेने होणारा वापर व त्या जपण्यासाठी त्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांची ओळख नवीन पिढीला व्हावी या हेतूने हे प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरविले.
या महोत्सवाचे उद्धाटन रवी वानखेडे, मुख्य वनसंरक्षक, शिक्षण व प्रशिक्षण, वनविभाग पुणे यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले रानभाज्यांची माहिती विद्यार्थ्यांना पोहोचावी व त्यांच्या मार्फत घरोघरी जाऊन जतन व्हावी, त्यांचे संवर्धन व्हावे यासाठीचा हा प्रयत्न आहे. अशी दुर्मिळ माहिती संकलित करुन पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थी मदत करतील. रानभाज्या व स्थानिक लोकांपर्यंत आपण पोहोचलो तर त्याचा फायदा सर्वाना मिळेल.
प्रेसिडेंट बायोस्फेअर डाॅ. सतिश पुणेकर म्हणाले, हा आदिवासींची संस्कृतीचा नैसर्गिक व जैविक वारसा जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अशी प्रदर्शने भरविली जातात. ही संस्कृती नष्ट होऊ नये म्हणून असे प्रयत्न आम्ही सतत करत राहू.
या प्रदर्शनासाठी (Ranbhaji 2022) खोसते गाव, शहापूर ठाणे येथील सौ नयना अशोक भुसारे, मंजुळा विलास भुसारे , सुनिता सदाशिव महाले आणी अशोक मारुति भुसारे यांनी नळीची भाजी, हाडासांधी, कडशिंगी, करटोल, कुर्डू, कौला, बरकी, केना, घोळु, भ्रामी, भारंगी, चावा, मोर, भाजी, बारडोला, काळा, आळू, चिचार्डे या रानभाज्या आणल्या होत्या. या सर्व भाज्या कशा करायच्या व त्याचे आर्युवेदीक फायदे काय आहेत हे त्यांनी समजावून सांगितले.
Saptashrungi : सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवास जल्लोषात प्रारंभ
डॉ. विनया घाटे यांच्या रानभाजी संवर्धनासाठी केलेल्या कामातून या प्रदर्शनासाठी कल्पना साकारली. याचा हेतू सांगताना डॉ. विनया घाटे म्हणाल्या, विविध रानभाज्यांचे वैभव टिकून रहावे व त्यांचे औषधि गुणधर्म सगळ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून आम्ही अथक प्रयत्न करत राहू. प्राचार्य डाॅ. संजत खरात यांनी प्रदर्शन घेण्यामागे विदेशी भाज्यापेक्षा देशी भाज्या आरोग्याला चांगल्या असतात. त्यांचे संरक्षण व संवर्धन निसर्ग प्रेम वाढल्याने शक्य होईल व प्रदर्शनामुळे सगळेच निसर्गाच्या जवळ जातील अशी भावना व्यक्त केली.
या प्रसंगी खोसते गावच्या सरपंच नयना भुसारे म्हणाल्या, शहरातल्या लोकांना रानभाज्या कश्या बनवितात हे माहिती नसते. आम्हाला जर एखादा स्टाॅल दिला तर आम्ही नक्की तुमच्या पर्यंत पोहोचू. तुमचे आमच्या गावी स्वागत आहे. हा ठेवा तुमच्यापर्यंत पोहोचावे ही आमची इच्छा आहे.
पी. ई. सोसाइटीचे सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर म्हणाले, असे कार्यक्रम विद्यार्थी हितासाठी घेतले जातील. या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. प्राची क्षीरसागर यांनी केले. विभाग प्रमुख डाॅ. प्राची रावळ यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला माॅडर्न शाळा गणेशखिंड व NCL, माॅडर्न महाविद्यालय, बाॅटनी विभाग, शिवाजीनगर, विद्यापीठ बाॅटनी विभाग व महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी भेट दिली याशिवाय नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. साधारणपणे ३०० निसर्गप्रेमी नागरिक विद्यार्थी यांनी प्रदर्शनाला भेट दिली.