Raosaheb Danave News : ‘शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात’

रावसाहेब दानवेंचा अजब दावा

एमपीसी न्यूज – दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. याच देशांनी ‘सीएए’च्या नावाखाली मुस्लिम समाजाला उचकवल असून भारतातील शेतकऱ्यांनी याचा विचार करावा असे आवाहन त्यांनी केले.

जालना जिल्ह्यातील कोलते टाकली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. दानवे म्हणाले, ‘हे शेतकऱ्यांचं आंदोलन नसून या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे.

पहिल्यांदाच देशातील मुस्लिम समाजाला भरकटवलं आणि सीएए आणि एनसीआरमुळं मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल, असं सांगितलं. पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का ?’ असा सवाल दानवेंनी यावेळा केला.

‘हा बाहेरच्या देशानं रचलेला कट आहे. शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं सांगत आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे,’ असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर व भाजपचे स्थानिक नेते केशव घोळके यांनीही शेतकरी आंदोलनाचा संबंध चीन आणि पाकिस्तान सोबत जोडला होता. तसंच, शेतकरी आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानमधून फंडिंग होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.