Ravet News : भाषा सुधारण्यासाठी राजकारण्यांना होमिओपॅथीच्या गोळ्या द्याव्यात – अ‍ॅड. उज्ज्वल निकम

एमपीसी न्यूज – ‘होमिओपॅथी शारीरिक, मानसिक आजारांवर प्रभावी ठरते. महाराष्ट्राच्या राजकारण, तसेच सध्याची राजकीय भाषा पाहता, द्वेषाचा रोग लागल्याचे दिसते. त्यावर उपचारासाठी होमिओपॅथीने पुढाकार घ्यायला हरकत नाही. होमिओपॅथी तज्ज्ञांनी अशा परिणामकारक गोळ्या राजकारण्यांसाठीही तयार कराव्यात, जेणेकरून त्यांच्या तोंडून शिरवाळ भाषा येणार नाही आणि श्रोत्यांना ऐकायला आनंद वाटेल.’ अशी मिश्किल टिप्पणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केली.

मिशन होमिओपॅथी व आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल अँड हिलींग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. अमरसिंह निकम लिखित ‘अ होमिओपॅथस् गाईड टू कोविड-19’ या पुस्तकाचे प्रकाशन व ‘होमिओपॅथीक कोविड हिरो’ सन्मान सोहळ्यात अ‍ॅड. निकम बोलत होते.

रावेत येथील हॉटेल ब्लू वॉटर येथे झालेल्या सोहळ्यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रसाद लाड, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह प्रवीण दबडगाव, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. अमरसिंह निकम, डॉ. जसवंत पाटील, अजय कौल, अ‍ॅड. आसावरी जगदाळे, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. उज्ज्वल निकम म्हणाले, ‘अ‍ॅलोपॅथी-होमिओपॅथी हा वाद, त्यातील मतमतांतरे जुना विषय आहे. पण होमिओपॅथीने अनेक चमत्कार घडवल्याचे पहिले आहे. ही पॅथी अनेक आजारांवर गुणकारी आहे. अ‍ॅलोपॅथीमध्ये अनेकदा औषधांचे विपरीत परिणाम होतात.

होमिओपॅथी त्याला अपवाद आहे. कोणत्याही ऑपरेशन किंवा इंजेक्शन शिवाय केवळ पांढऱ्या गोळ्या प्रभावी ठरतात. त्यामुळे होमिओपॅथीला सर्वमान्यता मिळण्याची आवश्यकता आहे.’

डॉ. अमरसिंह निकम यांच्या होमिओपॅथीतील संशोधन व कार्याबद्दल त्यांना पद्मश्री मिळायला हवी आणि त्यासाठी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी पुढाकार घ्यावा, असे विधान आमदार प्रसाद लाड यांनी केले.

त्यावर मिश्किल टिप्पणी करत अ‍ॅड. निकम म्हणाले, ‘ज्यांचे वकीलपत्र उज्ज्वल निकम घेतात, त्यांना यश मिळाल्याशिवाय राहत नाही, यावर विश्वास आहे. माझा जन्म हनुमान जयंतीचा असल्याने कोणते उड्डाण कोठे घ्यायचे याचा अंदाज आहे. डॉ. निकम यांच्या ‘पद्मश्री’ची केस लवकरच मार्गी लागेल.’

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ‘वैद्यकीय सेवेत मोठ्या प्रमाणात व्यवसायिकरण झालेले असताना डॉ. निकम व परिवार सातत्याने चांगले काम करत आहेत. पुस्तक रूपाने आपले अनुभव लोकांपर्यंत जायला हवेत. डॉ. निकम लिखित हे पुस्तक नवोदित डॉक्टरांना मार्गदर्शक ठरेल. शंभर खाटांचे होमिओपॅथी रुग्णालय उभारण्याचे धाडस डॉ. निकम यांनी केले आहे.’

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, ‘आरोग्याचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. होमिओपॅथीमध्ये शरीरावर कोणतेही विपरीत परिणाम न होता आजार बरा करण्याची क्षमता आहे. संशोधन आणि सेवा याची सांगड घालत डॉ. निकम यांनी होमिओपॅथीला वेगळी ओळख दिली आहे.’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिशन होमिओपॅथीचे डॉ. निलेश जंगले व आशिष चौबे यांनी केले.  आभार डॉ. सुचित्रा निकम यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.