Rawet : संशोधकवृत्तीचे अभियंते देशाचा वेगाने विकास करतील : डॉ. अरविंद शाळीग्राम
एमपीसी न्यूज – देशातील कनिष्ठ, मध्यम तसेच उच्च उत्पन्न गटातील नागरिकांची क्रयशक्ती दिवसेंदिवस वाढणार आहे. जीवन आणखी आरामदायी व्हावे. यासाठी प्रत्येक व्यक्ती मोबाईल, रिमोट, रोबोट वा तत्सम स्वयंचलित यंत्रांचा वापर आपल्या दैनंदिनीत करण्याचे प्रमाण वाढत आहे. इलेक्ट्रीक, स्वयंचलित व सौर उर्जेवरील कार अशा अनेक क्षेत्रात आणखी संशोधन व विकास होणे बाकी आहे. बदलाच्या या टप्प्यावर बहूतांशी यंत्रे स्वयंचलित होणार आहेत. त्याचे संशोधन, उत्पादन विक्री व इतर सेवांसाठी प्रशिक्षित व संशोधक वृत्ती असणा-या अभियंत्यांची गरज भासणार आहे. सर्वच क्षेत्रातील अभियंत्यांचा आगामी काळ उज्वल आहे. संशोधकवृत्तीचे हे अभियंते देशाचा वेगाने विकास करतील, असा आशावाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी व्यक्त केला.