Pune : शरद पवारांना चोख प्रत्युत्तर द्या ; भाजपच्या सायबर योद्ध्यांना अमित शहाचे आदेश
एमपीसी न्यूज – "शेतक-यांच्या गोष्टी काय करता, तुमच्या काळात शेतक-यांच्या जेवढ्या आत्महत्या होत होत्या त्यामध्ये आता (देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात) 33 टक्के घट झाली आहे. शरद पवार जर शेतक-यांच्या प्रश्नावर बोलत असतील तर त्यांना लगेच प्रत्युत्तर दिले पाहिजे. अशा प्रकारची उत्तरे देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी स्व:तला सज्ज ठेवले पाहिजे, या शब्दात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
पुण्यामध्ये आज ( दि.7) भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया प्रतिनिधीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये अमित शहा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अमित शहा म्हणाले, कुठल्याही प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनांची, भाजपच्या नेत्यांची भाषणं, त्यांचे ब्लॉग, पत्रकार परिषद या सर्वांची माहिती घेतली ठेवली पाहिजे.