Chinchwad News : दिघी, तळेगाव एमआयडीसी, हिंजवडीत तिघांना लुटले

एमपीसी न्यूज – दिघी, तळेगाव एमआयडीसी आणि हिंजवडी परिसरात जबरी चोरीच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 29) गुन्हे दाखल केले आहेत. तिन्ही घटनांमध्ये 28 हजार 450 रुपयांचा माल चोरीला गेला आहे.

सुनील गोविंद पवने (वय 30, रा. आळंदी देवाची) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सतीश श्रीरंग घोडके (वय 36, रा. केळगाव आळंदी), दीपक भगवान जोगदंड (वय 26, रा. च-होली बुद्रुक), प्रदीप मनोज मसळेकर (वय 24, रा. आळंदी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी रविवारी (दि. 29) मध्यरात्री साडेबारा वाजता फिर्यादी यांना अडवले. त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातून जबरदस्तीने रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा 18 हजार 300 रुपयांचा ऐवज काढून घेतला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

म्हाळाप्पा प्रकाश हबगोंडे (वय 25, रा. रुपीनगर, निगडी) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन ते चार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे कंटेनर चालक आहेत. ते रविवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास कातवी येथून कंटेनर घेऊन जात असताना आरोपींनी कंटेनर अडवला. कंटेनरच्या केबिनमध्ये घुसून दमदाटी करून एक ब्रेसलेट, मोबाईल फोन, पाकीट आणि पैसे असा एकूण 7 हजार 150 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.

सुमेध नारायण गुरव (वय 32, रा. खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि. 27) सायंकाळी साडेसहा ते सव्वासात वाजताच्या कालावधीत फिर्यादी हे भूमकर चौक येथून मुंबईकडे एका कारमधून जात होते. कार पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आली असता कार चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या एकाने फिर्यादी यांचा मोबाईल फोन फोन करण्याच्या बहाण्याने घेतला. त्यांनतर फोनमधील सिमकार्ड काढून फोन फिर्यादी यांना परत न देता तो चोरी केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.