Sas Bahu completes Twenty years – ‘सास – बहू’ ड्रामाची वीस वर्षे पूर्ण
'Saas-Bahu' drama completes twenty years 'क्योंकि सास भी कभी बहु थी' मालिकेला शुक्रवारी (3 जुलै) 20 वर्ष पूर्ण झाले
एमपीसी न्यूज – वीस वर्षापूर्वी भारतातील टेलिव्हिजनची दुनिया बदलणारे एक युग सुरु झाले. आज आपण त्याला खूपच सरावलो आहोत, त्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही, अनेकांच्या करमणुकीच्या कल्पना येथेच संपतात अशी एक गोष्ट म्हणजे सिरीयल्स. आणि या सिरीयल्स सुरु करण्याचे श्रेय जाते ते एकता कपूरला. तिला गंमतीने ‘छोट्या पडद्याची राणी’ असे म्हटले जाते.
एकताने बनवलेल्या काही लोकप्रिय मालिकांपैकी एक ‘क्योंकि सास भी कभी बहु थी’ मालिकेला शुक्रवारी (3 जुलै) 20 वर्ष पूर्ण झाले. या अनुषंगाने मालिकेची निर्माती एकता कपूरने इंन्स्टाग्रामवर या मालिकेविषयीच्या काही आठवणी शेअर केल्या. ही पहिली मालिका आहे ज्यासाठी चॅनेलने मागणी केलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे दिल्याचे एकताने यावेळी सांगितले.
आपल्या पहिल्या पोस्टमध्ये एकताने लिहिले की, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ची 20 वर्ष…मला आठवते की, मी नर्व्हस होऊन समीर सर आणि तरुण यांना या मालिकेविषयी सांगत होते. मी त्यांना सांगत होते की, ‘सास-बहू’ ड्रामा काम करू शकते… आणि आम्ही ते 1 लाख रुपयांमध्ये करण्यास तयार होतो.’
एकताने पुढे लिहिले की, ‘एका चॅनेलने भाव केला असेल आणि जास्तीचे पैसे दिले असे याआधी कधीच झाले नव्हते. कारण त्यांना चांगली गुणवत्ता हवी होती. पण तो चॅनेलचा दृढ विश्वास आणि समर्थन होते जे त्याने आम्हाला दिले होते. पहिल्यांदाच एखादा डेली सोप प्राइम टाइमवर होता आणि इतिहास घडवत होता.’ यानंतर एकताने समीर सर, तरुण कटियाल, मालिकेची संपूर्ण कास्ट आणि क्रू टीम, मोनिषा आणि स्टार प्लसचे आभार व्यक्त केले.
या मालिकेसाठी लिहिलेल्या दुसऱ्या पोस्टमध्ये एकताने लिहिले की, ‘क्योंकि चे 20 वर्ष… एक असा शो ज्याने माझे आयुष्य बदलले. त्यावेळी आम्हाला संधी दिल्याबद्दल नेटवर्कचे धन्यवाद.’ आपल्या पोस्टसोबत तिने शोचे टायटल सॉन्गचे दोन व्हिडिओ देखील शेअर केले, ज्यातील एका व्हिडिओत ती स्वतः दिसली.
एकताने पुढे लिहिले की, ‘मला वाचल्याचे आठवते की, गुजरात भूकंप आल्यानंतर लोकांनी कशाप्रकारे आपले टीव्ही सेट्स घराबाहेर ठेवले होते आणि ही मालिका पाहिली होती. माझ्यासाठी यापेक्षा नम्र करणारा क्षण आला नाही. 3 जुलै 2000 रोजी सुरु झालेल्या मालिकेचा शेवटचा एपिसोड 6 नोव्हेंबर 2008 रोजी प्रसारित झाला होता.
यातील प्रमुख अभिनेत्री आणि तुलसीमुळे घराघरात पोचलेल्या स्मृती इराणींनी ‘क्योंकी की सास भी कभी बहू थी’ या मालिकेला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत स्मृती यांनी त्यांचा पहिला सीन रिकॉल करताना काही आठवणी शेअर केल्या आहेत. सोबतच निर्माती एकता कपूरच्या आत्मविश्वासाचे त्यांनी कौतुकही केले आहे.
स्मृती यांनी लिहिले, ’20 वर्षांपूर्वी सुधा आंटीसोबतचा हा सीन माझा पहिला सीन होता. मी माझ्या लाईन्स पाठ केल्या होत्या. पण मी खूप जास्त घाबरले होते. एकता कपूरने दिग्दर्शकाला शूटिंग सुरु करण्याचा सल्ला दिला. या मुलीत तुलसीची भूमिका साकारण्याचे टॅलेंट नाही, त्यामुळे हा प्रोजेक्ट नक्कीच फ्लॉप होईल, असे असे दिग्दर्शकाने एकताला सांगितले होते.’
स्मृती पुढे लिहितात, ‘जेव्हा मी कलाकार म्हणून पूर्ण क्षमतेने शॉट का देत नाहीये? असा मला विचारले गेले होते. त्यावर मी म्हटले की, या भूमिकेसाठी मी कशी फिट आहे? हे जोवर मला सांगितले जाणार नाही, तोवर मी ती भूमिका कशी साकारु शकते. मी शब्द दिला की, यासाठी मी माझ्या सहकलाकारांची मदत घेईल. कारण मी हे एकटे करु शकत नाही. एकताने मला तसे करण्याचे स्वातंत्र्य दिले आणि नंतर जे घडले ते टीव्हीच्या इतिहासात नोंदवले गेले आहे’.
स्मृती यांनी या मालिकेशी संबंधित सर्व सहकारी कलाकार आणि क्रूचे देखील आभार मानले, ज्यांनी तुलसीच्या भूमिकेसाठी त्यांना मदत केली होती.