Pimpri : कलाप्रवास हा नेहमी निर्दोष निर्मितीसाठी व्हावा – रमेश वाकनीस
एमपीसी न्यूज – आत्मनिष्ठ कविता हीच समाजनिष्ठ कविता असते.कवी आत्मनिष्ठ असला तर त्याचे परीघ विस्तारत जातात.कलाप्रवास हा नेहमी निर्दोष निर्मितीसाठी व्हावा. असे मत ज्येष्ठ कवी व साहित्यिक रमेश वाकनीस यांनी व्यक्त केले
तुमच्या कवितेचा दीप हा जरी तुमच्या पावलांपुरता मर्यादित असला तरी त्यामुळे किती जणांचे आयुष्य उजळून निघेल हे सांगता येत नाही असे मत त्यांनी मांडले..निमित्त होते समरसता साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यांच्या साहित्य संवाद या उपक्रमाचे. नितीन हिरवे ,राजेंद्र घावटे, प्रदिप गांधलीकर, नंदकुमार मुरडे , सोमनाथ सलगर , मीना पोकरणा , अभय पोकरणा , बाळासाहेब सुबंध , वर्षा बालगोपाल , अंतरा देशपांडे , शामला पंडीत आदी उपस्थित होते.
दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा उपक्रम घेण्यात येतो.या वेळच्या साहित्य संवादात ,मंगला कांबळे व मृण्मयी नारद तसेच दुरस्थ साहित्यिक प्रसाद देशपांडे, वडोदरा से सहभागी झाले होते. मृण्मयी नारद यांच्या कवितांवर बोलताना दुस-या भाष्यकार मानसी चिटणीस यांनी मृण्मयीच्या कवितांना सावरीची उपमा देताना कवितेमधील स्त्री जाणिवांचे पदर आपल्या मनोगतात उलगडले..स्त्री कविता या नदीसारख्या असतात. आपली मनातली सारी गुपिते सा-या वेदना स्त्री आपल्या कवितेमधून व्यक्त करते ..असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
प्रसाद देशपांडे यांच्या कवितांचे अभिवाचन समृद्धी सुर्वे यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत केले. प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या सहज सुंदर मनोगतात त्यांनी तुकारामांच्या लेखन शैलीवर भाष्य केले.तूकारामांच्या कवितेतला भाव हा आत्मनिष्ठ असून सर्व चौकटी मोडूनच तुका ” आकाशाएवढा ” झाला अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक व सुत्रसंचालन सुहास घुमरे यांनी केले.तर शोभा जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या आयोजनात मंगला पाटसकर उज्ज्वला केळकर यांनी सहाय्य केले.