Pune : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन ‘राजमुद्रा’ असलेल्या झेंड्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध…!
एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मूळ पहिला झेंडा हा चार रंगाचा होता. जातीच्या नावावर मत मागण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचा वापर केला. परंतु त्यांना यश आलं नाही. राजकारणात चढउतार होत असतात परंतु मतासाठी जाती धर्माचा उपयोग करून झेंड्याचा रंग सुद्धा सरड्यासारखे सतत बदलता, असे रंग राजकारणात बदलता येत नाही. मनसेने आता नवीन भगवा झेंडा निर्माण करून त्यावर ‘राजमुद्रा’ छापलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’ ही राजकारण करण्याचे साधन नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी राजमुद्रेची निर्मिती केलेली आहे. त्या राजमुद्रेचा वापर कुठल्याही पक्षांनी राजकारण करण्यासाठी करू नये, अशी संभाजी ब्रिगेडची स्पष्ट भूमिका आहे. म्हणून मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा छापण्यास संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समतेचा भगवा झेंडा घेतला असेल तर स्वागत करू…! आम्ही भारतीय संविधान व लोकशाही मानणारे व्यक्ती आहोत. परंतु ‘राजमुद्रा’ वापरणं हे महाराष्ट्रातील शिवप्रेमी व संभाजी ब्रिगेड सहन करणार नाही. भगवा झेंडा हा समता आणि बंधुतेचा प्रतिक असून तथागत बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज शांतीचे सुद्धा प्रतिक आहे. तेच त्यांनी स्वीकारावं, त्यांनी हिंदुत्वाची झालंर पांघरु नये. पहिल्या मूळ झेंड्यात जातीचे रंग वापरले गेले..,? आता या जातीच्या रंगाचा मनसे करणार काय…? हा प्रश्न महाराष्ट्रा समोर पडलेला आहे.
देशाचे व राज्याचे निवडणूक आयोग छत्रपती यांचे वंशज व महाराष्ट्र सरकार यांच्याकडेही या झेंड्याविरोधात व झेंड्यावरील राजमुद्रे विरोधात संभाजी ब्रिगेड तक्रार करणार आहे. राज्यकारभाराची निशाणी आहे. ती झेंड्यावर मनसेला वापरता येणार नाही, अशी संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे. यासाठी मनसे विरोधात संभाजी ब्रिगेड भविष्यात तीव्र संघर्ष करणार आहे.