Sangavi: महिलांनी कर्मयोगी व्हावे -अंजली तापडिया
महिलांनी वेशभूषेतून दिला सामाजिक, पर्यावरणाबाबत संदेश
एमपीसी न्यूज – आयुष्य हे एका वहीसारखे आहे. पहिले व शेवटचे पान विधाता लिहितो. तर, मधली पाने आपण आपल्या कर्तृत्वाने भरायची असतात. त्यासाठी कर्मयोगी होणे गरजेचे आहे. कर्मयोगी म्हणजे दुस-याच्या उपयोगी पडणे. तसेच शरीर व मन प्रसन्न राहण्यासाठी शरीराला व्यायामाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात काही न काही तणाव असतोच. परंतु त्यातही महिलांनी आनंद शोधणे गरजेचे आहे. त्यामुळे तणाव कमी होतो, असे मार्गदर्शन अंजली तापडिया यांनी केले.
पिंपळे गुरवमधील निळू फुले रंगमंदिर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात महिलांसाठी ‘जीवन एक आनंदयात्रा’ या विषयावर अंजली तापडिया यांनी मार्गदर्शन केले. सांगवी परिसर महेश मंडळाच्या महिला समितीतर्फे महिला दिनानिमित्त महिला मेळावा घेण्यात आला.
यावेळी नगरसेविका शारदा सोनावणे, जमनाबाई राठी, अनुराधा जाजू, कविता लद्धा आदी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी मंडळाच्या महिला समिती अध्यक्षपदी पद्मा लोहिया यांची निवड करण्यात आली.
महिलांनी सामाजिक व पर्यावरणावर आधारित वेशभूषा साकारत विविध प्रकारचे सामाजिक संदेश दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नम्रता नावंदर यांनी, श्रुती मंत्री यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी मोनाली लाठी, श्रुती जाजू , प्रीती बलदवा, गौरी नावंदर, सुरेखा चांडक यांनी परिश्रम घेतले.