Sanjay Leela Bhansali About aishwarya: ऐश्वर्याची कामाप्रती असलेली निष्ठा मला त्यावेळी जाणवली

Sanjay Leela Bhansali About aishwarya: I felt Aishwarya's devotion to work at that time तू ऐश्वर्या राय किंवा मिस वर्ल्ड असल्याचं डोक्यात ठेवून काम केलं तर कदाचित तू योग्यरित्या काम करु शकणार नाही, असं मी ऐश्वर्याला सांगितलं होतं

एमपीसी न्यूज – आजही निंबुडा निंबुडा म्हटले की खास राजस्थानी घागरा घालून मनमुराद नाचणारी सौंदर्यवती ऐश्वर्याच डोळ्यासमोर येते. संजय लीला भन्साळीचे उत्तम दिग्दर्शन, ऐश्वर्या, सलमान आणि अजय देवगणचा संयत अभिनय आणि सुंदर लोकेशन्स यामुळे ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट गाजला होता. बॉलिवूड हिट चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचे नाव आजही घेतलं जाते. त्यावेळी ऐश्वर्या आणि सलमान यांची लव्हस्टोरी चांगलीच चर्चेत होती.

मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. ऐश्वर्या अभिषेकच्या संसारात रमली. मात्र सलमान आजही योग्य जोडीदाराच्या शोधात आहे. मात्र सध्या या चित्रपटाशी निगडीत संजय लीला भन्साळी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी चित्रपटासाठी ऐश्वर्याने कशी मेहनत केली होती हे सांगितलं आहे.

सध्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरील एक थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सेटवरील काही सीन दिसत असून ऐश्वर्या तिच्या स्क्रिप्ट वाचण्यात कशी व्यग्र आहे हे दिसून येत आहे. तसंच संजय लीला भन्साळी तिच्या कामाविषयी सांगत आहेत. ‘यावेळी ऐश्वर्याने या भूमिकेला न्याय देण्यासाठी सारं काही केलं जे गरजेचं होतं’, असं त्यांनी सांगितलं.

‘जसं जसं चित्रपटाचं चित्रीकरण पुढे सरकत होतं, तसतशी मला जाणीव व्हायला लागली होती की, या भूमिकेला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी ऐश्वर्या व्यवस्थित पार पाडत होती. ती सगळं काही करत होती जे मला चित्रपटासाठी आवश्यक होतं.

मला चित्रपटात काम करताना प्रामाणिकपणा हवा. जर तुम्ही चित्रपटाशी आणि स्क्रिप्टप्रती प्रामाणिकता दाखवत असाल तरच तुमचं काम योग्य आणि उत्तम होईल. पण जर तू ऐश्वर्या राय किंवा मिस वर्ल्ड असल्याचं डोक्यात ठेवून काम केलं तर कदाचित तू योग्यरित्या काम करु शकणार नाही, असं मी ऐश्वर्याला सांगितलं होतं आणि तिनेदेखील प्रामाणिकपणे या चित्रपटात काम केलं’, असं संजय लीला भन्साळी यांनी सांगितलं.

दरम्यान, ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट त्याकाळी तुफान लोकप्रिय झाला होता. ऐश्वर्या आणि सलमानच्या जोडीला प्रेक्षकांना अक्षरश: उचलून धरलं होतं. त्यामुळे आजही हा चित्रपट अनेक जण तितक्याच आवडीने पाहतात.

ऐश्वर्या आणि सलमान व्यतिरिक्त या चित्रपटात अजय देवगण,विक्रम गोखले, झोहरा सेहगल, हेलन, स्मिता जयकर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. हा चित्रपट १९९९ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.