Pimpri: ‘सारा पास’ शिखरावर फडकविला सह्याद्रीचा भगवा !

खडतर प्रवास करून अठरा गिर्यारोहकांची शिखरावर यशस्वी चढाई

एमपीसी न्यूज – पुणे , पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रात काम करणा-या 18 गिर्यारोहकांनी एकत्रित येत हिमाचल प्रदेशातील अत्यंत कठीण समजल्या जाणा-या ‘सारा पास’ शिखरावर यशस्वी चढाई केली. बर्फाळ प्रदेश आणि धोकादायक डोंगररांगेतून खडतर प्रवास करून त्यांनी या शिखरावर सह्याद्रीचा भगवा ध्वज फडकविला.

या तरुणांनी ही मोहिम 13 ते 20 मे 2018 या आठ दिवसांच्या कालावधीत पूर्ण केली. हिमाचल प्रदेशातील बर्फाळ डोंगररांगा असलेला कठीण हा परिसर आहे. या मोहिमेत 23 ते 63 वर्षे वयोगटातील गिर्यारोहकांचा समावेश होता. या मोहिमेचे नेतृत्व पारुल मोटा यांनी केले. तर, सुशील दुधाने, सुनील ताम्हाणे, विनोद मेहता, नाथा राणे, दीपक कोलगावकर, निकिता शाह, मिलिंद तुपे -जयंत तुपे -कोमल राजपाठक, क्षीपा गोखले, नीरजा गोखले, अंकुर परासर, रोहन व शिवानी गोरे, जितेंद्र आगरवाल, हेमा आगरवाल हे सहभागी झाले होते.

मोहिमेविषयी माहिती देताना सुशील दुधाने म्हणाले, " या मोहिमेसाठी 13 मे रोजी आम्ही पुण्यापासून निघालो. 15 मे रोजी कसोल या बेस कॅम्पच्या ठिकाणी पोहचून 16 मे रोजी कसोल (1526 मीटर 5005 फूट ) येथून ट्रेकला सुरुवात केली. जवळपास 3 किलोमीटर सपाट पदभ्रमण केल्यानंतर नंतर छोट्या मोठ्या प्रमाणात चढ उतार सुरू झाले. सुमारे 14 किलोमीटर अंतर साडेचार तासात पार करून मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो. 17 मे रोजी सकाळी आठ वाजता ग्रहण येथून ट्रेकला सुरुवात केली. खडी रस्त्याचे चढण आणि अंगावर येणारी सरळ वाट कठीण होती. प्रत्येक पाऊल श्वास घेऊन टाकावे लागत होते. साडेचार तास पदभ्रमण करून आम्ही फक्त 3 किलोमीटर अंतर पार करून आम्ही मीन थास (3155 मीटर 10438 फूट ) येथे पोहचलो. तेथे मुक्काम केल्यानंतर 18 मे ला सकाळी नऊ वाजता आम्ही मीन थास येथून ट्रेकला सुरुवात केली. चार तास चालून झाल्यानंतर नगारु (3811 मीटर 12500 फूट) या ठिकाणी अडीच किलोमीटर अंतर पार करुन पोहचलो. 19 मे पहाटे साडेपाच वाजता आम्ही सार पासच्या दिशेने निघालो. एकदम खडी चढण त्यात काही ठिकाणी बर्फ असलेल्या मार्गावरून वाट काढत पुढे जात होतो"

"नंतर अर्धा किलोमीटर अंतर पार केल्यानंतर पूर्ण बर्फाची वाट सुरू झाली. बर्फाळ प्रदेशात अनेकांची अवस्था बिकट झाली होती. बर्फावरुन चालताना नाकीनऊ आले होते. परंतु, धडपडत या संकटांवर मात करीत ज्यासाठी हा सगळा अट्टाहास केला हाोता. त्या सारा पास शिखरावर (4208 मीटर 13475 फुट दिड किलोमीटर पार करुन झाल्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता पाऊल ठेवले. तेथे एकच जल्लोष करत "शिवाजी महराज की, जय जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव" या घोषणा देऊन भगवा ध्वज माथ्यावर फडकावला. तासभर सर्व परिसर फिरलो व परतीच्या मार्गाला लागलो उतरताना बर्फावरून घसरगुंडी करीत खाली आलो. एका ठिकाणी मी स्वत: बर्फावरून घसरलो. परंतु, लीडर पुश्पेंद्र ठाकूर याने धावत येऊन मला अडवून या संकटातून बाहेर काढले.

त्यानंतर आम्ही नगारूला परत आलो. त्यानतंर लगेच ग्रहणच्या दिशेने निघालो. ग्रहण या ठिकाणी 8 किलोमीटर अंतर पार करून पोहचलो. 20 मेला सकाळी साडेनऊ वाजता ग्रहण येथून ट्रेकला सुरुवात केली. दीड वाजता कसोल येथे ट्रेकचा समारोप झाला. कसोल ते परत कसोल 41 किलोमीटरचा एकूण ट्रेक पूर्ण झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.