Saswad : गावठी कट्ट्यासाठी दिलेले पैसे परत न केल्यामुळे तरुणाचा खून; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – गावठी कट्ट्यासाठी दिलेले पैसे परत न दिल्यामुळे एका तरुणाचा अमानुषपणे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवून दिल्याची धक्कादायक घटना 24 ऑक्टोबरला सासवड जवळील भिवरी गावाजवळील एका शेतात घडली.

अभिषेक अजय सिंग (वय 19, रा. सनसवाडी, शिरूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पंकज पोपट गायकवाड (वय 23, रा. सनसवाडी, शिरूर) आणि बाबू ऊर्फ ऋषिकेश वामन भोरडे (वय 19, रा.सनसवाडी, शिरूर) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवरी गावातील एका शेतात एक बेवारस मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलिसानी तपास करून तो मृतदेह अभिषेक सिंग या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले होते.

आरोपी पंकज याने अभिषेक याला गावठी कट्टा घेण्यासाठी 33 हजार रुपये दिले होते. परंतु अभिषेकने पंकजला गावठी कट्टा दिला नाही. त्यामुळे पंकज आणि बाबू अभिषेककडे पैसे परत मागत होते. अभिषेक मात्र त्यांना पैसे देण्याचे टाळत होता. या गोष्टीचा राग धरून पंकज आणि बाबू या दोघांनी मिळून अभिषेकला जीवे मारण्याचा बेत आखला.

त्यानुसार त्या दोघांनी अभिषेकला दारू पिण्याच्या बहाण्याने त्याला बोलावून घेतले आणि हवेली येथील वाडेबोलाई येथे दारू पाजून त्याचा चाकूने गळा कापून आणि डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर अभिषेखची ओळख पटू नये म्हणून त्याचा मृतदेह पेट्रोल टाकून भिवरी गावाजवळील असलेल्या एका शेतात पेटवून दिला.

याप्रकरणी दोन्ही आरोपीना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सासवड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.