Pimpri : आपल्या संस्कृतीचे व संस्काराचे जतन करा -प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब
पाणी व वीजेचा अतिवापर टाळावा – प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब
एमपीसी न्यूज – आपल्या संस्कृतीचे व संस्काराचे जतन करावे. वीज, पाण्याचा अतिवापर टाळून पर्यावरणात संतुलन राखण्यासाठी व समाजातील जुन्या बुरसट रुढी परंपरा बंद करण्यासाठी सर्वांनी एकजूटीने पुढे येण्याची गरज आहे, असे मार्गदर्शन प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी केली.
निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे पवित्र चातुर्मास महिन्यानिमित्त वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले आहे. यावेळी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा सर्व विश्वस्त उपस्थित होते.
प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब म्हणाल्या की, ‘‘ वीज उत्पादन करण्यासाठी पाणी व कोळशाचा वापर केला जातो. पाणी व वीजेच्या अतिवापराने, अपव्ययाने पर्यावरणाची आणि निसर्गाची विपरीत हानी होत आहे. मध्यरात्रीपर्यंत चालणा-या सार्वजनिक कार्यक्रमात वीजेचा अतिवापर होतो. त्यामुळे ‘नाईट लाईफ’ ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे सर्व बंधू-भगिनींनी वीज व पाण्याचा अतिवापर करण्याचे टाळून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प करावा. अन्यथा याचा त्रास पुढील पिढीला भोगावा लागेल. यासाठी सर्व उद्योजकांनी आपला उद्योग व्यवसाय मध्यरात्रीपर्यंत सुरु ठेऊ नये. जे उद्योग व्यवसाय करायचे असतील. त्यात सातत्य चिकाटी ठेऊन जागृतपणे सर्व व्यवहार करावेत. नको त्या गोष्टीत वेळ, पैसा व ऊर्जा वाया घालवू नये. कुटुंब प्रमुखाने आपल्या कुटुंबीयांशी व विशेषत: शोडष वयातील मुला-मुलींशी सुसंवाद ठेऊन दक्षता घ्यावी. समाजातील विविध सार्वजनिक समारंभ, लग्नसमारंभ दिवसा करावेत की ज्यामुळे रात्रीचा वीजवापर कमी होईल. अशा समारंभात होणारी अन्नाची नासाडी टाळावी. यासाठी युवकांनी पुढाकार घ्यायला हवा. रात्रीचे भोजन टाळावे असा जो आपल्या पूर्वजांनी सल्ला दिला होता. त्यामागे त्यांची हिच भावना होती. आपल्या संस्कृतिचे व संस्काराचे जतन करावे ही काळाची गरज आहे’’, असेही प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी सांगितले.