School Reopen : नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा- वर्षा गायकवाड
एमपीसी न्यूज – नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. कोरोना प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांतील शाळा सुरू करताना जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.
राज्यातील अनेक ठिकाणी 23 नोव्हेंबरपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार आहेत. मात्र, रुग्णसंख्या वाढत असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने आपल्या हद्दीतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
९वी ते ११वीचे वर्ग सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार! कोरोना प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांतील शाळा सुरू करताना जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा- शिक्षण मंत्री @VarshaEGaikwad यांच्या सूचना pic.twitter.com/0WDCvxa6qb
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 20, 2020
त्या पुढे म्हणाल्या, ‘आपापल्या हद्दीतील शाळा सुरु करण्याचा निर्णय हा मी स्थानिक प्रशासनावरच सोडला होता. मुंबई महापालिका आयुक्तांसोबत सकाळी माझी या विषयावर चर्चा झाली.
त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत मुंबई हद्दीतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. माझ्या अजूनही इतर संबंधितांशी बैठका आणि चर्चा सुरुच आहेत. ज्या ठिकाणी पूर्ण तयारी झाली आहे, त्या ठिकाणी शाळा 23 नोव्हेंबरला सुरु कराव्यात.
ज्या ठिकाणी अद्याप तयारी झालेली नाही त्याठिकाणी स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा’, अशा सूचना शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिल्या आहेत. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहीनीला त्यांनी याबाबत माहिती दिली.