Pune : जम्मू काश्मीर जनतेला सन्मानाने जगता यावे म्हणून 370 कलम रद्द – जे.पी.नड्डा
एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील जनतेला सन्मानाने जगता यावे, म्हणून 370 कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला. 65 वर्ष सत्ता भोगणाऱ्या पक्षाला 370 बाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
भारतीय जनता पार्टीचा पश्चिम महाराष्ट्र विजय संकल्प मेळावा गणेश कला क्रीडा स्वारगेट येथे आयोजित केला होता. त्यावेळी नड्डा बोलत होते. राज्यमंत्री बाळा भेगडे, महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, संजय पाटील, शहर भाजप अध्यक्षा माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.
जे.पी.नड्डा म्हणाले, आपला देश एकसंघ रहावा, म्हणून पंतप्रधान मोदी यांनी जम्मू आणि काश्मीर येथील 370 कलम हटविले आहे. भविष्यात नवीन उद्योग, उच्च शिक्षण, तरुणाच्या हाताला रोजगार मिळणार आहे. प्रमुख नेत्यांनी सत्तेमध्ये असताना केलेल्या घोटाळ्यामुळे आता इडी, सीबीआय या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. भाजप सर्व सामान्य कार्यकर्त्याला न्याय देते, तर काही पक्ष मुलगा, मुलगी, जावई यांच्या भोवती चालतो, अशी एक देशात परिवार पार्टी आहे, अशा शब्दात गांधी कुटुंबावर त्यांनी निशाणा साधला.
भाजपच्या काळात अनेक विकास कामे झाले असून आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपच्या हाती सत्ता देऊन विकास कामे करण्याची संधी द्या, असे आवाहन नड्डा यांनी केले.